आपल्याकडे दोन मने असतात, एक सकारात्मक विचारांचे तर दुसरे नकारात्मक विचारांचे. या दोन मनांचे कायम द्वंद्व चालूच असते. या द्वंद्वात सकारात्मक विचारांचे मन कसे जिंकून द्यावे याविषयी थोडेसे…
आपल्या जीवनात अनेक चांगले-वाईट बदल घडत असतात. या बदलांना स्वीकारताना आपण आपले मन शांत कसे राहील याकडे लक्ष द्यावयाचे आहे. जर चांगला बदल घडला तर हुरळून जायचे नाही. त्याचबरोबर वाईट बदल घडला तर जास्त दुःख करत बसावयाचे नाही. जे आहे ते सहर्ष मनाने स्वीकारून पुढे जायचे. जे मनासारखे घडले नाही ते बदलून मनासारखे घडविण्याचा प्रयत्न सोडावयाचा नाही.
आपण खूप चांगला प्रयत्न करूनही आपल्याला यश येत नाही, अशा वेळी आपण आणखी सुधारणा कशी घडवून आणता येईल हे पाहवयाचे आहे. पण जेव्हा आपण सतत अपयशी ठरत असू त्यावेळी मनातून निराश होत असतो. याचा अर्थ असा नाही की, आपण कधीच यशस्वी ठरणार नाही. समजा, आपण एखाद्या परीक्षेत खूप वेळा प्रयत्न करून उत्तीर्ण झालोच नाही. याचा अर्थ असा नाही की, आपल्याला आयुष्यात आता कोणताच मार्ग उरला नाही. त्या परीक्षेवर आपले जीवन अवलंबून नाही. मग ती कितीही चांगली नोकरी मिळवून देणारी परीक्षा असो… आपण दुसऱ्या क्षेत्रात प्रयत्न करू शकतो किंवा नोकरी न करता व्यवसायाकडे वळू शकतो. एक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही म्हणजे जीवनात हरलो असे नाही.
बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करत असलेल्या क्षेत्रात आपल्या हातात काही घटक नसतात. आपण आपल्याला जे काही करावयाचे आहे ते सर्व प्रयत्न केले, कोठेही कसूर म्हणून सोडली नाही; पण यश मिळाले नाही तर अशा प्रसंगी निराश व्हावयाचे नाही. सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू इव्हान लेंडल यांनी विंबल्डन ही स्पर्धा वगळता सर्व स्पर्धा जिंकल्या. शेवटी त्यांना 1978 साली मिळविलेल्या कुमार गटातील विंबल्डन स्पर्धेच्या विजेतेपदावर समाधान मानावे लागले. याचा अर्थ असा नाही की, त्यांचे प्रयत्न कमी पडले, त्यांच्याकडे आवश्यक ते कौशल्य नव्हते. हे लक्षात घेता आपल्याला असेच म्हणावे लागते की, त्यांच्याकडे “नशिबाची साथ नव्हती.’ आपल्याही बाबतीत असे घडू शकते. आवश्यक ते सर्व काही असतानाही यश मिळू शकत नाही. येथे लक्षात घ्यायला हवे की, नशिबाला फक्त आपण 1 टक्का एवढीच जागा ठेवायची. बाकी 99 टक्के आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. बरेचजण उलटे करतात, नशिबाला 99 टक्के जागा देतात. मग अशा वेळी नैराश्यच येते. हेच आपल्याला टाळायचे आहे.
आपल्याला आवश्यक असेल तेवढेच धाडस करावयाचे आहे. जसे आपल्याला फेडता येईल एवढेच कर्ज काढायचे. नाही तर कामासाठी कर्ज काढले ते काम होत नाही आणि कर्ज डोईजड होते. अशा वेळी मानसिक ताण येऊ शकतो. हेच आपण टाळू शकतो.
कर्ज, अग्नी आणि रोग यांना वेळीच आळा घालावा, हे जर वाढत गेले तर नियंत्रणाबाहेर जाते. नियंत्रणात ठेवले तर मानसिक ताण येणार नाही.
आपल्याला शारीरिक व्याधी विकारांनी जखडून ठेवलेले असेल आणि त्यावर जर काही उपायच नसेल तर जे आहे ते स्वीकारून आपले उर्वरित आयुष्य जगायचे. दीपा मलिक यांनी अपंगत्वावर मात करून ऑलिंपिकमध्ये 2016 साली रजतपदक मिळविले आहे. आपण जर पायाने अपंग असू तर संगणकाचे काम करू शकतो. काही क्षेत्रे जरी आपल्याला बंद झाली तरी सगळीच नव्हे, ही पण एक जमेची बाजू आहे हे लक्षात घ्यावे.
कमळाचे बी हे शेकडो वर्षे जगते. कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठातील एका वनस्पती शास्त्रज्ञांनी कमळाचे बी यशस्वीपणे रुजविले; पण ते बी चीनमधील एका सुकलेल्या तळ्यातील होते आणि ते सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचे होते. म्हणजेच निसर्गाने किती सकारात्मक विचार केलेला आहे हे कळते. एवढ्या दीर्घ कालावधीत एकदातरी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि ते बी रुजेल! आपण असा सकारात्मक दृष्टिकोन का बाळगू नये?
जे नियमित व्यायाम करतात, ते जास्त काळ आनंदी राहतात. व्यायामामुळे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालते. शरीरात बरेच अनुकूल रासायनिक बदल घडतात. आत्मविश्वास वाढतो. चेहऱ्यावर उत्साह जाणवतो व सतेज कांती प्राप्त होते. पाणी योग्य त्या प्रमाणात पिले जाते. आणखीनही बरेच अनुकूल घटक आपल्यात तयार होतात. यामुळे नैराश्येचे विचार आपल्या जवळपासही भटकत नाहीत. जरी प्रतिकूल घटना आपल्या बाबतीत घडली तरी सकारात्मक दृष्टिकोन, विचार प्रभावी ठरतो. विशेष म्हणजे व्यायाम करणे आपल्याच हातात आहे, व्यायामासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही, तर आपल्याऐवजी कोणी दुसऱ्याने व्यायाम करून चालत नाही.
आपण कोणताही खेळ खेळण्याची सवय ठेवली पाहिजे. खेळामुळे हार-जीतचा अनुभव येतच असतो. त्यामुळे जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाणे सोपे होते. जीवनात प्रेरणा देणारी पुस्तके वाचली पाहिजेत. “ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती… निराश जीवा धीर देऊनी पुढे घेऊनी जाती…’ असे कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी सांगितलेच आहे.
प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी जो कालावधी लागेल त्यामध्ये आपण तग धरून उभे राहिले पाहिजे. आपण नैराश्येच्या गर्तेत सापडू नये यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही आपण काही उपाय करू शकतो. आपण स्वतःला कोणत्यातरी कामात व्यस्त ठेवू शकतो. त्या कामातून भले आपल्याला काही लाभ मिळाला नाही तरी चालेल पण मन रिकामे राहत नाही, “रिकामे मन सैतानाचे घर’ असते. एखादा पाळीव प्राणी सोबत ठेवू शकतो. एखादे वाद्य वाजवू शकतो. ज्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडतो तिच्या सहवासात राहावे. तामसी आहार वर्जित करून सात्त्विक आहाराला प्राधान्य द्यावे. आवडते खेळ खेळावे. प्राणायाम करावा. धार्मिक कार्यात सहभाग घ्यावा. समाज सेवा करावी. या व अशा बऱ्याच काही उपायांनी आपण आपले मन हे नैराश्येच्या गर्तेत सापडू देत नाही.
जेव्हा केव्हा आपण मनाने थकून जाऊ व नकारात्मक विचार येतील तेव्हा आपल्या मनोमंदिराच्या गाभाऱ्यात शांत बसून आपल्या मनातील “नकारात्मक विचारांना हद्दपार करण्याचा निश्चय करावा व आपल्या मनात सकारात्मक विचारांचे पुष्प उमलावे’ याच सकारात्मक विचार पुष्पांनी आपल्या मनोदेवतेची आराधना संपन्न होईल याच शंकाच नाही.
– अनिकेत भालेराव