भिन्न व्यक्तित्त्ववाद याला इंग्रजीत इंडिव्हिज्युऍयलिटी असं म्हणतात. खरं तर हा मानवाच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मानवाला स्वतंत्र पूर्णपणे वेगळं व्यक्तित्त्व असतं. अर्थात यामध्ये त्याच्या पूर्वजांच्या जनुकांचा भागही असतो परंतु त्याच्या (किंवा तिच्या) व्यक्तित्वाच्या जडणघडणीत सभोवतालचं वातावरण, संस्कार, गुरूवर्यांची आणि इतरांची शिकवण, अनुभव तसंच स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता यांचाही मोठा भाग असतो.
गमतीची गोष्ट अशी की आपल्या जवळून जाणारी कुठलीही व्यक्ती आणि आपण यांच्यामधील जनुकांत 99.9 टक्के साम्य असतं. तरीही आपण त्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे भिन्न असतो. याचाच अर्थ असा की आपल्या व्यक्तित्वामधला फरक हा केवळ 0.1 टक्के जनुकांमुळे आहे. चिंपांझी आणि मानव यांच्यातील जनुकांतील साम्य हे जवळपास 98.5 टक्के आहे. म्हणजे केवळ दीड टक्क्यांच्या फरकानं चिंपांझी हे चिंपांझी झाले आणि आपण मानव झालो!
तसंच जनुकीय आराखड्यातील केवळ 0.1 टक्के फरकामुळे प्रत्येक व्यक्ती केवळ बाह्यांगानंच भिन्न नसते तर स्वभावविशेषांनीही खूप भिन्न असते- अगदी समरूप (आयडेंटिकल) जुळी असली तरी! हा निसर्गानं मांडलेला विचित्र खेळच म्हणायला पाहिजे. मात्र बोनोबो नामक छोट्या चिंपांझींमध्ये चेहरेपट्टी आणि स्वभावविशेष यांमध्ये व्यक्तित्त्वभिन्नता आढळते. यावरून बोनोबो हे मानवाच्या अधिक जवळचे असावेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
मग असा प्रश्न निर्माण होतो की मानवजातीत जशी व्यक्तिभिन्नता आहे तशी इतर प्राण्यांत आहे का? असू शकेल. मात्र मानवाइतकी ती स्पष्ट नाही. म्हणजे एखादा अमीबा दुसऱ्या अमीबापेक्षा अधिक आक्रमक असू शकेल पण सर्वसाधारण निरीक्षणानंतर दोन अमीबांमधील व्यक्तिभिन्नता शोधून काढणं अशक्य आहे. तेच मानवाव्यतिरिक्त इतर प्राण्यांबाबत. मात्र उत्कांतीसोपानावर जेवढा प्राणी उच्चस्तरावरचा तेवढी त्या प्रजातीमध्ये व्यक्तिभिन्नता असण्याची शक्यता जास्त. यामुळेच मानवामध्ये ती प्रकर्षानं आढळते तशी चिंपांझींमध्येही बऱ्याच प्रमाणात सापडते.निसर्गाची किमया खरोखरच अचंबित करणारी आहे.
अमीबासारख्या मानवाच्या दृष्टीनं क्षुद्र प्राण्याची जनुकीय रचना मनुष्यातील रचनेपेक्षा शंभर पटीनं मोठी आहे. मग निसर्गानं असं का केलं असावं? माझ्या मते, अमीबाला उत्क्रांत होऊन उच्च दर्जाचा प्राणी होण्यासाठी निसर्गानं ही संधी दिली असावी. मात्र त्यानं प्रयत्नपूर्वक तसं करण्यापेक्षा खालच्या दर्जाचा प्राणी राहूनच अमरत्व प्राप्त करणं पसंत केलं असावं. कारण एका अमीबाचे काही काळानंतर दोन तुकडे होऊन दोन वेगवेगळे अमीबा निर्माण होतात. हेच त्यांचं पुनरुत्पादन होय. म्हणजे एका अर्थी अमीबा चिरायु आहेत. कदाचित त्यांच्यातील एका गटानं उत्क्रांत होऊन त्यातूनच आजचे उच्च प्रजातींचे प्राणी निर्माण झाले असावेत.
आता एक गोष्ट पाहा. एका प्रजातीची अनेक झुरळं पाहिली तर त्यांमध्ये आपल्याला शारीरिक किंवा स्वभावभिन्नता जवळ जवळ दिसणारच नाही. कदाचित खाद्य किंवा मादी प्राप्तीसाठीच्या संघर्षात काही आक्रमक तर काही सौम्य आढळतीलही. पण तेवढीच ती भिन्नता. तीही शारीरिक सामर्थ्याशी निगडित असू शकते. मनुष्य प्रजातीत चेहरेपट्टीतील भिन्नता आढळतेच परंतु स्वभाववैशिष्ट्यातही खूप भिन्नता आढळते. ही भिन्नता स्पर्धेमुळे मानवात निर्माण झाली आहे. खालच्या स्तरातील प्राण्यातही स्पर्धा असते पण ती केवळ जगण्यातील टिकाव, सहचरा/रीची प्राप्ती आणि अन्नशोध यापुरतीच मर्यादित असते. मानवातील स्पर्धा मात्र उच्च संस्कृतीमुळे ज्ञान, कला यांसारख्या गुणांच्या प्रदर्शनासाठी वेगवेगळे मार्ग शोधीत असते आणि त्यातूनच व्यक्तित्त्वभिन्नता निर्माण झाली आहे.
मानवी स्पर्धेमुळे स्वभावभिन्नता हे जरी वरदान असलं तरी त्यातूनच दुष्प्रवृत्तीही निर्माण होते. कठोर स्पर्धेमुळे अनेक जण यशस्वी होण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करताना दिसतात. अलीकडील अभ्यासात असं दिसून आलं आहे की, परीक्षांमध्ये कॉपी करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. प्रत्यक्षदर्शी कार्यक्रमात (रिऍलिटी शो) अधिकाधिक गुण मिळावेत यासाठी स्पर्धक कुठल्याही थराला जातात. निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी कोणत्याही खोट्यानाट्या आश्वासनांची खैरात केली जाते. सध्या चालू असलेलं युद्धही वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच चालू आहे. एवंच, व्यक्तित्त्वभिन्नता ही स्पर्धेच्या माध्यमातून संस्कृतीला पुढे नेत असली तरी तिलाही एक काळी कड आहे.
– श्रीनिवास शारंगपाणी