व्यक्ती समाजाचा एक महत्त्वाचा घटक असतो. समाजात वावरताना तो सामाजिक आणि वैयक्तिक हित साधण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. त्यातही व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे व्यक्तिमत्वांतही वैविध्य आढळून येत असते. व्यक्तीनुसार त्यांचे स्वभाव, वागण्याची पद्धती, विचारक्षमता आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी भिन्न असते. त्याच्यातील या वैशिष्ट्यांवरच त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. समाजात वावरताना अनेक व्यक्तिमत्त्वे आपल्या दृष्टिक्षेपास पडत असतात. ज्यांची आपण त्यांच्यातील स्वभाववैशिष्ट्याप्रमाणे आपल्या मनात एक प्रतिमा निर्माण करीत असतो. यातील काही मोजकी व्यक्तिमत्त्वे ही आपल्यावर छाप पाडण्यात यशस्वी ठरत असतात. त्यांच्या आचार, विचार आणि वर्तनाने आपण प्रभावित होतो.
एखाद्या व्यक्तीचे इतरांपेक्षा असणारे वेगळेपण त्यांची समाजात एक वेगळी छबी निर्माण करीत असतात. असे म्हणतात की, गर्दीचा एक भाग होण्यापेक्षा गर्दीचे कारण व्हा. लोकांत आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडा. चारचौघांत उठून दिसा. मात्र हे घडण्यासाठी नेमके काय करावे बरं? हा प्रश्न निश्चितच आपल्याला पडला असेल. याचे उत्तर आहे, तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जाणून असामान्य कर्तृत्व सिद्ध करणे.
एकदा वडिलांबरोबर जत्रेत गेलेल्या मुलाने दोन वेगवेगळे फुगे घेतले. घरी आल्यावर त्या फुग्यांशी खेळत असताना त्याला एक गोष्ट जाणवली. त्यातील एक फुगा घराच्या छताला चिटकून राहायचा. त्याला कितीही खाली खेचले तरी तो पुन्हा वरच्या दिशेनेच जायचा. दुसरा साधारण फुगा मात्र धक्का दिल्यास वर जायचा पुन्हा काही सेकंदात खाली यायचा. ना राहवून त्या मुलाने आपल्या वडिलांना विचारले, “बाबा, यातील एक फुगा वरच राहतोय तर दुसरा माझ्या कृतीप्रमाणे का फिरतोय.’
वडील त्याला सांगू लागले, “यातील वर राहणाऱ्या फुग्यात हेलियम नावाचा गॅस आहे त्यामुळे तो वरच राहतो. तर दुसऱ्या फुग्यात मात्र साधी हवा आहे. त्यामुळे तो काही वेळाने पुन्हा खाली येतो.’ मुलाला उत्तर मिळाल्यामुळे त्याने समाधानाने मान डोलावली. त्यावर वडिलांनी मुलाला पुन्हा विचारले, “तुला यातून काय शिकायला मिळाले?’
मुलगा क्षणात उत्तरला, “बाबा जर आपल्याला वर जायचंय तर आपल्यात काहीतरी स्पेशल असायला हवं. नाहीतर इकडून तिकडे भरकटणारे तर अनेक आहेत.’ वडिलांनी मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्याचे कौतुक केले. यानिमित्ताने यशस्वी जीवन जगण्याचा मूलमंत्रच जणू त्या मुलाला मिळाला होता.
आपल्या आयुष्यासाठीही ही फुग्यांची गोष्ट अगदी तंतोतंत लागू होते. ज्याप्रमाणे त्या फुग्यात असणाऱ्या हेलियममुळे त्या फुग्याला उंची प्राप्त होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आतमध्ये असणाऱ्या अद्वितीय क्षमता, कौशल्ये ही आपल्या जीवनातील उंचीचे परिमाण ठरत असतात. आपल्या आतील गुण ठरवतात की आपण किती पुढे (उंचीवर) जाणार आहोत. यासाठी आपण बदल स्वीकारणे गरजेचे आहे. तोसुद्धा आंतरिक बदल. आपल्या विचारांचा, क्षमतेचा, बुद्धीचातुर्याचा आणि आत्मविश्वासाचा. आपण जी कृती करू, जो विचार करू त्यात नवनिर्मितीचा अंश असायला हवा. तोच तो पणाची पुसटशी सावलीही त्यात यायला नको. सामान्य बनून राहण्यापेक्षा असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून आपला नावलौकिक व्हायला हवा आणि यासाठी आपण नेहमीच आग्रही असायला पाहिजे.
– सागर ननावरे