सृष्टीचा नुकताच उगम झाला होता आणि नियतीने आपला सारिपाट नुकताच मांडायला सुरुवात केली होती. त्याच वेळी चमत्कार झाला आणि परमेश्वराने प्राजक्ताला निर्व्याज बहराचा आशीर्वाद दिला. सारा आसमंत त्याच्या स्वर्गीय सुगंधाने दरवळला. त्याचवेळी आणखी एकजण सर्वांपासून दूर उभी राहून प्राजक्ताचे होणारे कौतुक न्याहाळत होती. त्या वनाची वनदेवताच जणू! प्राजक्ताच्या नकळत प्रेमात पडून आपल्या प्रेमाची कबुली तिला द्यायची होती; पण आपला तो पुष्पसांभार पाहून, “मी योगी! ही आसक्ती मला काय कामाची?’ असे म्हणून प्राजक्ताने तो सारा दलभार एका क्षणात झटकून टाकला. ते पाहून वनदेवीच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहू लागले आणि पाहता पाहता तिच्या जागी एक वृक्ष दिसू लागला. ती संध्याकाळची वेळ होती.
सारे प्राजक्ताच्या वागण्याचे आश्चर्य करत घरी परतत होते. इतक्यात त्यांना शांतपणे कोपऱ्यात उभा असलेला वृक्ष दिसला. मंद मंद दरवळणाऱ्या, डोळ्यांच्या आकाराच्या फुलांनी लगडलेला… ती फुले शांतपणे झरत होती जशी की श्रावणातली रिमझिम सर! सगळ्यांना आश्चर्य वाटले, हा इतका निर्मल सुगंधी फुलांचा वृक्ष कोणता? मग त्यांना समजले की अरे ही तर वनदेवी! प्राजक्तावर मनोमन प्रेम करणारी, त्याच्यासाठी झुरणारी वनदेवी! सगळेजण हळहळले… ही गोष्ट प्राजक्ताला समजली तेव्हा पहाट झाली होती आणि प्राजक्ताचा नवा बहर नुकताच फुलू लागला होता. वनदेवीच्या वियोगाने प्राजक्त हिरमुसला आणि त्याचा पहाटबहर झरू लागला. म्हणूनच कदाचित एकमेकांच्या विरहात प्राजक्त पहाटे आणि बकुळ संध्याकाळी झरतात.
बकुळ! बकुळ म्हटले की डोळ्यांसमोर एक काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांची बाजिंदी उभी राहते. कोणतेच बंधन, नियम न मानणारी, वेगा बॉंड पण निरागस मुलगी! जी प्रेमात पडली आहे पण आपल्या प्रेमाची कबुली न देता आपल्या प्रियकराच्या विरहात जळते आहे. अनेकदा लेकीन मधली डिंपल किंवा ए-दिल-ए-नादॉं म्हणत भटकणारी हेमा आणि सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.. असे म्हणणारी स्मिता मला आधीच्या जन्मात बकुळ असाव्यात असे वाटते. याचे कारण म्हणजे त्यांचे डोळे!
त्यांच्या डोळ्यांमध्ये जी आर्त कहाणी लपली आहे ना ती कुठे ना कुठे बकुळीशी नाते सांगते, असे मला कायमच वाटत आले आहे. माणसाचे कसे असते ना? माणूसपणाच्या व्याख्येला माणूस कंटाळला की त्याला काहीही व्हावेसे वाटते. पण निसर्गाचे तसे नसतेच कधी! तो आपल्या विचारांशी, नात्यांशी, जोडलेल्या धाग्यांशी प्रामाणिक राहतो. म्हणून आज भले कितीही युगे लोटली असोत बकुळ आपल्या प्रियकराच्या विरहात झरते आहे. मानवी भावभावना आणि त्या भावनेसोबत कळत नकळत होणारी मनाची फरपट, आपल्या इच्छा-आकांक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण केलेली धडपड, ही सर्वश्रूत आहे.
पण कधीकधी असे होते की कोणत्या ना कोणत्या कारणाने या गोष्टी अधुऱ्या राहून जातात आणि शेवटी उरते त्या इच्छा पूर्ण करण्यामागे नशिबात आलेली भरकट. असे म्हणतात, मानवी आयुष्य हे त्रिमितीय असते; पण या तीन मितींच्या पलीकडेही एक चौथी मिती अस्तित्वात असते. ज्यात ही अधुऱ्या राहिलेल्या गोष्टींमुळे होणारी फरपट दिसून येते. घटनांची वलये असतात. एका घटनेतून दुसऱ्या घटनेत जाताना ही वलये पार करण्याचा प्रवास करावा लागतो प्रत्येकाला. आपण सकाळी उठतो, रात्री निजतो, दिवसाच्या या पहिल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण अशी असंख्य वलये पार करत राहतो. कोणत्याही गोष्टीची वेळ संपत आली की आपल्याला जाग येते आणि मग आपली धावाधाव सुरू होते… अत्तराची कुपी संपत आली की लोक त्यातील अत्तर जपून वापरायला लागतात. आयुष्य अगदी तसेच असते. बकुळीची ही व्यथा गुलजारांनाही समजली असावी बहुतेक.
म्हणूनच ते सहजपणे या बकुळ फुलांचे झुरणे आपल्या शब्दात लिहून गेले. हे जे जळणे आहे ते इतके आतल्या आत आहे की, त्याने सारे आयुष्यच धुमसते आहे, अशी भावना दाटून येते. न जाणे किती जन्मांपासून ही भरकट आहे, जी संपतच नाही. कधी संपेल हे माहिती नाही. हा जो अविरत वेदना सोबत घेऊन सुरू झालेला प्रवास आहे त्यात आजवर किती वळणे येऊन गेली, किती ठिकाणे येऊन गेली याची गणतीच नाही. तरी शेवटचा मुक्काम काही सापडत नाही. या दिशाहीन भरकटीची सुरुवात तर झालीय; पण त्याचा अंत काही केल्या होत नाही, या जाणिवेमागची वेदना सतत मंदपणे जळत आणि जाळत ठेवते. विरहाची प्रत्येक रात्र ही अश्रूंमध्ये भिजूनच पूर्णत्वाला जाते.
ते एकटेपण इतके प्रचंड आहे की त्यात स्वत:ची सावली देखील सोबत नाही. आतून दाटून आलेलं उजाडलेपण आणि बाहेरचे शुष्क ओसाड भावनाहीन वाळवंट यांनी सारे आयुष्य व्यापले आहे. “सिली’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ओलसर असा होतो. पण इथे बकुळीचे हे झरणे आणि झुरणे तिची न संपणारी विरहाची, दुराव्याची गोष्ट सांगत राहतो. संध्याकाळी उमललेली डोळ्यांची फुले, विरहाचा सुगंध दरवळत रात्रीच्या अश्रूंमध्ये भिजून आणखीनच ओलसर, सर्द होतात. अशी रात्र अनुभवणे म्हणजे धड जगणेही नाही आणि मरणेही नाही. भावनांचा ओलावा असला तरी मन मात्र विरहात जळतच राहते.
तुम्हाला गुलाब चटकन सापडेल. मोगरा, जास्वंद, जाई-जुई हेसुद्धा सापडतील; पण कधी कुठल्या आखीव-रेखीव लॅंडस्केपीय अंगणात एखाद्या का होईना पण कोपऱ्यात बकुळीचे झाड दिसले का? मला माहिती आहे याचे उत्तर नाही असेच असेल. बकुळ म्हणा किंवा बकुळी, अशा गर्दीत रमणारी नाहीच मुळी! गावाकडच्या एखाद्या अंगणात किंवा गावदेवीच्या देवराईत या बकुळीचे घर असते. हजारो, डोळ्यांसारख्या दिसणाऱ्या फुलांनी बहरलेली बकुळ पाहणे हा नयनोत्सव असतो माझ्यासाठी. तो उत्सव अनुभवताना अगदी हरखून जायला होतं. तिच्या सुगंधाने मनावर गारुड होत जाते आणि आठवणींचा, स्वप्नांचा एकेक पदर ओंजळीतून सुटायला लागतो. वसंत बापट यांच्या ओळी आठवतात-
या बकुळीच्या झाडाखाली
आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नांसाठी
एक रेशमी झुला झुले
मला आठवते आमच्या कोल्हापूर मधले कात्यायनी देवीचे मंदिर आणि मंदिराच्या परिसरातील बकुळीची मोठमोठे वृक्ष होते. बऱ्याचदा आमची सहल तिथे जायची तेव्हा या बकुळीच्या झाडाखालीच आम्हाला डबे खायला बसवले जायचे. मला अजूनही आठवतंय डबा खाताना एखादे फूल गिरक्या खात डोक्यावर किंवा थेट डब्यातच येऊन विसावायचे. इतके भारी वाटायचे तेव्हा! रिकामा झालेला डबा स्वच्छ धुऊन त्यात ही अशी खाली मातीत विसावलेली फुले गोळा करणे हा सहलीतला “मस्ट’ क्षण होता माझ्यासाठी.
एखाद्याच्या प्रेमात पडल्यावर प्रेम पेरत जातो आपण. त्या क्षणांनंतरच्या प्रत्येक क्षणात आपण नव्याने रुजून येतो त्या एखाद्याच्या डोळ्यात… हे रुजणे कालांतराने इतके खोल होत जाते की कधीतरी स्वत:ला शोधताना त्या एखाद्याचे संदर्भ सतत समोर येत राहतात. कुणावर प्रेम करताना आणि कुणालातरी प्रेम देताना इतके भरून जातो आपण की हळूहळू आपल्यातून उधाणून उतू जातो आपण. अशावेळी आठवणींचा बहर लेऊन शांतपणे झरत राहावे आपण. हेच बकुळीने शिकवले आहे. त्यामुळेच कदाचित ही बकुळ माझ्या मनात घर करून राहिली आहे. नुसती रूपानेच नाही तर सुगंधानेही!
– मानसी चिटणीस