मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. यामुळे 2 ते 3 तीन दिवस तणावाचे वातावरण होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मागणीनंतर शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असल्याचे जाहीर केले. यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचे बंड थांबणार नसल्याचा दावा केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, “अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही. येत्या काही दिवसात, महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा काही दगाफटका करतील यात शंका नाही.” दमानिया यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे.
यावेळी अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णयावरही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. नव्या नेतृत्वाला संधी द्यायला हवी होती.”
“पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत. शरद पवार यांनी खेळी करून बॅटही माझी आणि चेंडूही माझा हे दाखवून दिलं आहे. पण ही स्टोरी बोगस आहे. कारण येत्या काही दिवसात ते दिसून येईल. अजित पवार यांची खेळी अजून संपलेली नाही. येत्या काही दिवसात ते आपल्या आमदारांना गोळा करून मोठा दगाफटका करतील,” असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.