वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 13 गावांमध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही पाण्याच्या टाकीसाठी जागा उलब्ध झालेली नाही. त्यामुळे या योजनेचे काम रखडले आहेत. आमदार सुनील शेळके संबंधित गावांमध्ये बॅनर लावून जागा देण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींसह ग्रामस्थांना जाहीर आवाहन केले आहे.
मावळात नऊ धरणे असुन देखील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात महिलांना पाणी आणण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो. तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 112 पाणी योजनांचे काम सुरु आहे. वारंवार पाठपुरावा करुन देखील जागा मिळत नसल्याने आमदार शेळके यांनी गावात बॅनर लावून जाहीर आवाहन केले आहे.
तालुक्यात अनेक दानशूर व्यक्तींनी पाण्याच्या टाकीसाठी जागेसाठी जागा देऊन गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी योगदान दिले आहे. अनेक कुटुंबांनी दातृत्वाचा आदर्श यामाध्यमातून समाजासमोर ठेवला आहे. केवळ जागेअभावी गावाच्या विकासाला खीळ बसू नये. ही यामागची भावना असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
टाकीसाठी जागा उपलब्ध नसलेली गावे
गावाचे नाव टाकी क्षमता
आंबळे 10 हजार लिटर
भाजगाव 17 हजार लिटर
गोवित्री 58 हजार लिटर
नागाथली 8 हजार लिटर
सांगिसे 10 हजार लिटर
थोरण 20 हजार लिटर
शिरदे 17 हजार लिटर
शिवली 61हजार लिटर
भडवली 42 हजार लिटर
गेव्हंडे खडक 20हजार लिटर
पांगळोली 85 हजार लिटर
वारु 28 हजार लिटर
कादव, वाघेश्वर 26 हजार लिटर.
काय म्हटले आहे आवाहनात
जाहीर आवाहनात आमदार शेळके यांनी म्हटले आहे की, गावातील पुढारी मंडळी व ग्रामस्थांना जाहीर आवाहन, आपल्या गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाला असुन सदर पाणी योजनेचा विकास आराखडा बनविताना भविष्याचा विचार करुन लोकसंख्येनुसार पाण्याची टाकी बांधणेसाठी ग्रामपंचायतीकडून हमीपत्र प्राप्त झाले होते. परंतु सदर टाकीसाठी अद्यापही जागा उपलब्ध करुन दिलेली नसल्याने योजनेचे काम रखडले आहे. तरी कृपया,गावाच्या हितासाठी सर्वांनी एकमताने विचार करुन टाकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि आपल्या गावातील पाणी योजनेचे प्रलंबित असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, ही नम्र विनंती.