लखनौ – उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे अवघा देश हादरला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. विरोधकांनी या पाशवी अत्याचारावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल याबाबत वक्तव्य करताना चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते. योगिनाच्या या आवाहनावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज प्रतिक्रिया देत त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर प्रियंका यांनी याबाबतची भूमिका मांडली असून त्या लिहतात, “काल युपीच्या मुख्यमंत्र्यांनी संवादातून समस्या सोडवण्याचे भाष्य केले. तर मग ते पीडितेच्या कुटूंबाचे ऐकतील का? हाथरस डीएमवर कारवाई कधी? न्यायालयीन चौकशीचे आदेश कधी?न्यायाची पहिली पायरी आहे पीडित मुलीचे ऐकून घेणे. मात्र भाजपकडून आजही पीडित मुलीविरोधात दुष्प्रचार सुरू आहे.”
कल यूपी के सीएम साहब ने संवाद से समस्याओं को हल करने की बात कही।
तो क्या वो पीड़ित परिवार की बात सुनेंगे? हाथरस डीएम पर कार्रवाई कब? न्यायिक जांच के आदेश कब?
न्याय की पहली सीढ़ी है पीड़ित लड़की की बात सुनना। वास्तविकता ये है कि बीजेपी आज भी लड़की के खिलाफ दुष्प्रचार कर रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2020
काय म्हणाले होते योगी?
हाथरस प्रकरणाबाबत वक्तव्य करताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधक विकासाची प्रक्रिया थांबवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी, “प्रश्न कितीही गहन असला तरी त्याच्यावर संवादातून मार्ग काढता येतो. उत्तर प्रदेशात तर संवाद हेच प्रश्न सोडवण्याचे एकमेव माध्यम आहे.” असं वक्तव्य देखील केलं होत.