दुबई – दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला मार्गदर्शन केल्यामुळे टीका सुरू झाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी संताप व्यक्त केला आहे. अध्यक्ष म्हणून नाही तर भारताकडून पाचशेपेक्षाही जास्त सामने खेळण्याचा अनुभव असल्यानेच नवोदितांना सल्ला दिला असे सांगत गांगुलीने टीकाकारांना अवास्तव महत्त्व देत नसल्याचाही टोला हाणला आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान गागुंलीने अय्यर याच्याशी संवाद साधत त्याला मार्गदर्शन केले होते. त्यावरुन गांगुलीला टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते. गांगुली यांनी केलेले कृत्य पक्षपाती असल्याचीही टीका झाली. मात्र, या असल्या वक्तव्यांचा सातत्याने समाचार घेतण्याच्या गांगुली यांनी पुन्हा एकदा टीकाकारांनाच टोले हाणले आहेत.
मी 2009 साली या संघाचा मेंटॉर होतो. भारतीय संघाकडून सर्व प्रकारच्या क्रिकेटचे मिळून जवळपास 500 सामने खेळलो आहे. संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. मग याच अनुभवाचा लाभ नवोदितांनाही व्हावा या भूमिकेतून अय्यरला टीप्स देण्याचे काम केले. त्यात कोणताही पक्षपात नाही, उलट माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येत असलेल्या प्रत्येकाला त्याचे समाधान होईपर्यंत मार्गदर्शन करणे माझे कर्तव्य आहे, असे सांगून गांगुली याने टीकाकारांना मी कधीच आवास्तव महत्त्व देत नाही, असेही मत व्यक्त केले.
मी आता बीसीसीआयचा अध्यक्ष असलो तरीही मी देशासाठी खेळलो आहे हे टीकाकार कसे विसरतात. संघातील नवोदित खेळाडूंशी संवाद साधणे चूक आहे का, अय्यर असो किंवा विराट कोहली सर्वांनाच मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने मी पक्षपात करतो असे जर कोणाला वाटत असेल तर त्यानेच आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले.