मुंबई – महाराष्ट्र सरकारमार्फत देण्यात येणारा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. आज 16 एप्रिल रोजी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान केला जाणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोकांनी देखील प्रचंड गर्दी केली आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास या सोहळ्यला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले होते.
कार्यक्रमासाठी करण्यात आलेली सोय –
या सोहळ्यासाठी 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पिण्याच्या पाण्यासाठी 250 टँकर आणि 2100 नळ बसविण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी 9000 तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. याशिवाय वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून 69 रुग्णावाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. देशभरातून येणाऱ्या श्री सदस्यांची कोणत्याही अडचण होऊ नये, यासाठी खारघर आणि नवी मुंबईच्या मार्गांवर जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य –
धर्माधिकारी यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2014 साली त्यांना डॉक्टरेट अर्थात मानद पदवी देण्यात आली. 2017 मधे पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री डॉ. दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. त्यातून पर्यावरण पुरक संदेश त्यांनी समाजाला दिला.