सातारा – पुलवामा घटनेला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते आणि जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले होते. ही घटना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याचा आरोप करत कॉंग्रेसने साताऱ्यात “जवाब दो मोदी जवाब दो’ आंदोलन करत केंद्र सरकारचा जोरदार निषेध केला.
पुलवामा घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असून या घटनेत 49 जवानांचे बळी गेले. या सर्व घटनेला मोदी सरकार जबाबदार असून त्याचे उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी सत्यपाल मलिक यांनी केली होती. सत्यपाल मलिक यांच्या वक्तव्याने देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेचा कॉंग्रेसच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
मोदींनी याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी करत जिल्हा कॉंग्रेस कमिटीसमोरील मुख्य रस्त्यावर निदर्शने करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश प्रतिनिधी बाबासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. अल्पना यादव, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव धनश्री महाडिक, प्रदेश प्रतिनिधी रफिकशेठ बागवान, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, जावळी तालुकाध्यक्ष संदीप माने, वाई तालुकाध्यक्ष विलास पिसाळ, अन्वर पाशाखान, मनोजकुमार तपासे, बाळासाहेब शिरसाट, ओबीसी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, सातारा शहराध्यक्ष रजनीताई पवार, प्राची ताकतोडे, जस्मिन खान, मालन परळकर, संभाजी उतेकर, विजय मोरे, रणधीर गायकवाड, सुरेश कुंभार, अनिता नाझरे, संतोष डांगे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी मोदी सरकार विरोधात “मोदी हटाव देश बचाव, मोदी सरकार जबाब दो, जबाब दो, अशा घोषणा देत पुलवामा हल्ला हा तुमच्या फायद्यासाठी केला का, सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास का सांगितले, भारतीय जवानांना नेण्यासाठी विमानाची मागणी केली होती ती का नाकारली, पुलवामा घटनेतील 300 किलो आरडीएक्स कुठून आले, पुलवामा घटना व 40 जवानांचे बलिदान हे नरेंद्र मोदी यांनी लोकसभा जिंकण्यासाठी केले होते का, असे अनेक प्रश्न या आंदोलनादरम्यान विचारण्यात आले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भाजप प्रदेशाध्यक्षांचा निषेध
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागावी मगच महाराष्ट्रात यावे असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने या आंदोलनादरम्यान जोरदार निषेध करण्यात आला. राहुल गांधी महाराष्ट्रात येणारच. त्यांना अडवण्याची धमक कोणामध्येही नसल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.