पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रेडी रेकनरच्या दरात दि. १ एप्रिलपासून वाढ होण्याची शक्यता तसेच मार्च अखेरीस खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यावर नागरिकांचा भर आहे. यामुळे दस्तनोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी गर्दी होत आहे,
अशातच नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील क्लाऊडमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने गुरुवारी सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमधील दस्तनोंदणीचे काम ठप्प पडले. यामुळे दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, अनेकांना तासन् तास ताटकळत उभे रहावे लागले.
राज्यात ५०० पेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या ठिकाणी दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची कायम गर्दी असते. राज्यभरात दररोज सरासरी ८ ते १० हजार दस्तांची नोंदणी होते. परंतु, नोंदणी विभागाच्या प्रणालीतील समस्येमुळे गुरुवारी राज्यातील दस्तनोंदणी ठप्प पडली होती. दुपारी तीन नंतर ही समस्या दूर करण्यात नोंदणी विभागाला यश आले. त्यानंतर दस्तनोंदणीचे काम सुरुळीत झाले.
२० मिनिटांच्या कामासाठी चार तास…
दस्त नोंदणी कार्यालयात अनेकवेळा सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा तांत्रिक समस्येमुळे दस्तनोंदणी होऊ शकत नाही. तसेच काही वेळा सर्व्हर संथगतीने सुरू असतो. त्यामुळे दस्त नोंदणीच्या सुमारे २० मिनिटांच्या कामासाठी तीन ते चार तास लागतात, अशी तक्रार नागरिकांनी केली. या प्रकारामुळे दस्तनोंदणीसाठी बाहेरगावाहून अथवा इतर जिल्ह्यांतून आलेले नागरिक, रजा काढून येणारा नोकरदार वर्ग याना त्रास सहन करावा लागला.
मुद्रांक शुल्क भरूनही मन:स्ताप…
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविल्यानंतर मुद्रांक शुल्क व दस्त हाताळणी शुल्क आकारले जाते. नागरिकांकडून शुल्क आकारूनही सुविधा मात्र मिळत नसल्याचे समोर आले आहे. सध्याच्या स्थितीतीत वेळेला अधिक महत्त्व आहे.
मालमत्ता खरेदीदार, विक्री करणारी व्यक्ती त्यांच्यासोबत साक्षीदार असे सर्वजण दस्त नोंदणीवेळी हजर असतात. या सर्वांना सर्व्हर डाऊन होणे, अथवा संथ होणे याचा त्रास सहन करावा लागत आहे. एका दस्ताला उशीर झाला तर पुढील सर्व दस्त नोंदणी ताटकळतात. दस्त नोंदणीसाठी हजारो रुपयांचे मुद्रांक शुल्क भरूनही नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात मन:स्ताप सहन करावा लागतो.
क्लाऊडवरील स्पेस वाढवावी…
नोंदणी विभागाकडून मध्यंतरी सर्व्हरचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी नोंदणी विभागाचा सर्व्हरवरील डेटा क्लाऊड मध्ये स्थलांतरीत करण्यात आला. हे काम राज्यस्तरावरील एका कंपनीला देण्यात आले. क्लाऊडवर डेटा स्थलांतरीत झाल्यानंतर सर्व्हर डाऊन अथवा संथ होणे, ही समस्या राहणार नाही, अशा दावा शासनाकडून करण्यात येत होता.
मात्र गुरुवारी ही समस्या पुन्हा निर्माण झाल्याने शासनाचा दावा फोल ठरला. यापार्श्वभूमीवर ही समस्या दूर करण्यासाठी दस्तनोंदणीसाठी गर्दी होणाऱ्या वेळी क्लाऊडवर अधिक स्पेस निर्माण करून दस्तनोंदणीच्या प्रणालीचा वेग कायम ठेवण्याची मागणी होत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात सुविधांची वानवा…
राज्याला महसूल मिळवून देण्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. नोंदणी विभागाकडे दरवर्षी ४० हजार कोटींहून अधिक महसूल मिळतो. एवढा महसूल देऊनही दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत.
कार्यालयात बसण्याची अपुरी व्यवस्था, कमी जागेत कार्यालय असणे, पाणी पिण्याची व्यवस्था नाही, कार्यालयात बसण्यास तसेच उभे राहण्यासही जागा नसल्याने नागरिकांना कार्यालयाबाहेर उन्हात उभे राहावे लागते, त्यामुळे एवढा महसूल मिळूनही दुय्यम निबंधक कार्यालयासाठी निधी देण्यास शासन हात आखडता घेत आहे.
नोंदणी विभागाच्या क्लाऊडच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे दस्तनोंदणीचे काम काही वेळ थांबले होते. क्लाऊडचे काम पाहणाऱ्या कंपनीशी संपर्क करून ही समस्या दूर करण्यात आली आहे. दस्तनोंदणीच्या प्रणालीमध्ये समस्या येणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहे. लवकरच यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येईल. – हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरिक्षक
– सकाळी ०७:३० ते दुपारी ०३:०० पर्यंत काम बंद
– संगणकीय यंत्रणेतील त्रुटींचा सातत्याने फटका
– महसूल विभागाकडून गांभिर्याने कार्यवाहीची गरज
– नागरिकांकडून संताप व्यक्त