दोन्ही नराधमांना पोलिसांकडून अटक
बलरामपूर (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात झालेल्या आणखी एका सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित दलित युवतीचा आज मृत्यू झाला.
हाथसरच्या सामूहिक बलात्कार पीडित युवतीच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित युवती मंगळवारी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली होती. ती घरी परतत असताना 3-4 जणांनी तिचे अपहरण केले आणि तिला जवळच्या खोलीमध्ये नेले. तेथे तिला इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
त्यानंतर या आरोपींनी ई-रिक्शा करून या युवतीला घरी पाठवून दिले होते. तिला घराजवळ टाकून देण्यात आले होते. सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांनी पीडित युवतीचे पाय आणि पाठीचा कणा मोडून टाकला होता. त्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभेही राहू शकत नव्हती, असे या पीडित युवतीच्या आईने बुधवारी रात्री पत्रकारांना सांगितले.
ही युवती एका खासगी फर्ममध्ये काम करत होती. मंगळवारी गंभीर अवस्थेत ती घरी परतली होती. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला, असे बलरामपूरचे पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले.
पीडित युवतीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शाहिद आणि साहिल अशी आरोपींची ओळख निश्चित केली आणि त्यांना अटक केली. या युवतीचे पाय आणि पाठ मोडण्यात आले असल्याबाबत शवविच्छेदन अहवालात निश्चितपणे सांगितले गेलेले नाही. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित युवतीवर बुधवारी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले, असेही पोलीस म्हणाले.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरवरून या संदर्भात उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवरने हाथरसनंतर बलरामपूरमध्ये घडलेल्या या प्रकरणातील दोषींबाबत त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.