उद्भवू शकते वीज टंचाईचे गंभीर संकट
नवी दिल्ली -देशात आता वीजनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर कोळसा टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. या सर्व वीज उत्पादक प्रकल्पांमध्ये सध्या केवळ सात दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध झाल्याची अधिकृत माहिती मध्यवर्ती वीज प्राधिकरणाने दिली आहे. देशातील 38 प्रमुख वीज उत्पादक प्लांटमधून 46 हजार 720 मेगावॅट विजेची निर्मिती कोळशाच्या आधारे केली जाते. त्यांच्याकडील सध्याचा एकूण उपलब्ध कोळसा साठा हा केवळ सात दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिला आहे, असे या प्राधिकरणाचे म्हणणे आहे. पीटीआयने ही बातमी दिली आहे.
कोळशावर आधारित वीज प्रकल्पांमध्ये सात दिवसांपेक्षा कमी कोळसा साठा असेल तर ती क्रिटिकल सिच्युएशन समजली जाते. जर हा साठा केवळ तीन दिवस पुरेल इतकाच असेल तर ती स्थिती सुपर क्रिटिकल समजली जाते. त्या हिशेबाने या 38 मोठ्या प्रकल्पांमध्ये क्रिटिकल स्थिती निर्माण झाली आहे.
या वीज प्रकल्पांनी आपली कोळासा बिलांची थकबाकी चुकती न केल्याने ही बहुतांशी स्थिती निर्माण झाली आहे.
काही प्रकल्पांनी त्यांना मंजूर साठा न उचलल्यानेही ही स्थिती उद्भवली आहे. कारण काहीही असले तरी या 38 वीज प्रकल्पांमध्ये कोळसा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम झाला तर देशात आणखी एक भीषण संकट उद्भवू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या काळात विजेची मागणी वाढती असते. ती गरज भागवण्याची चिंता भविष्यात निर्माण होऊ शकते, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये एकूण 377 गिगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. त्यातील 200 गिगावॅट निर्मिती कोळशावर केली जाते. 46 गिगावॅट वीज जलविद्युत प्रकल्पांमध्ये तयार केली जाते. आणि 93 गिगावॅट वीजनिर्मितीतील सोलर, विंड अशा अपारंपरिक स्रोत यातून केली जाते. ही 31 मार्च 2021 ची आकडेवारी आहे. तथापि, असे असले तरी वीज वहनाच्या ग्रीड स्थैर्यासाठी कोळसा आधारित वीज प्रकल्पांतून सुरळीत वीजपुरवठा होणे अगत्याचे आहे.
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात गंभीर बाब अशी आहे की, वर उल्लेख केलेल्या 36 प्रकल्पांपैकी 21 प्रकल्पांमध्ये सुपर क्रिटिकल स्थिती निर्माण झाली आहे, कारण त्यांच्याकडे सध्या केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक आहे. या 21 वीज प्रकल्पांची वीजनिर्मिती क्षमता 26440 मेगावॅट इतकी आहे. त्यातच तलचेर येथील 460 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेला प्रकल्प याच महिन्यात बंद पडला आहे.