३ ते ६ वयोगटातील ८ हजार ५२८ लाभार्थी
जळोची- करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत बालवाडीच्या बालकांना सकस आहार मिळण्यासाठी घरपोच आहाराच्या वस्तू दिल्या जात आहेत. बारामती तालुक्यातील ३ ते ६ वयोगटातील ८ हजार ५२८ बालकांना या वस्तू दिल्या जात असल्याची माहिती महिला व बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकारी पुनम मराठे यांनी दिली.
पूर्वी अंगणवाडीच्या बालकांना अंगणवाडीतच ताजा सकस आहार देण्यात येत होता. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर २० मार्च ते १५ मे पर्यंत घरपोच वाटप करण्याचे आदेश मिळालेे होते. त्यानुसार मार्च ते जून पर्यंत बारामती तालुक्यातील ३ ते ६ वयोगटातील ८ हजार ५२८ बालकांना घरपोच आहाराच्या वस्तू वाटप करण्यात आल्या. यामध्ये प्रति बालकांस चना ७५० ग्रॅम, मुगडाळ ७०० ग्रॅम, तांदूळ ७७५ ग्रॅम, गहू ७७५ ग्रॅम, मिरची २०० ग्रॅम, हळद २०० ग्रॅम, मीठ ४०० ग्रॅम, सोयाबीन तेल ५०० ग्रॅम अशा वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात आले आहे.