कात्रज, दि. 19 (प्रतिनिधी) -दक्षिण उपनगर परिसरातील धनकवडी, आंबेगाव पठार, बालाजी नगर, कात्रज, दत्तनगर, आंबेगाव खुर्द या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या तळमळीने मांडत ठोस उपाययोजनांबाबतची मागणी केली. याबाबतचे गांभीर्य लक्षात घेत आमदार भिमराव तापकीर यांनी थेट उभे राहून सर्वांना शांत करीत याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजनांच्या सूचना केल्या.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपयायोजना करण्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन शांतता कमिटी व समन्वय समितीच्या माध्यमातून धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी त्या-त्या भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी समस्या मांडल्या. यावेळी सहाय्यक उपायुक्त किशोरी शिंदे, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, वाहतूक नियंत्रण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडप्पा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रताप बोबडे, समन्वयक कुमार कूट, मनपा पथविभागाचे उप अभियंता दिलीप पांडकर, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, महाराष्ट्र वाहन चालक-मालक संघटनेचे बाबा शिंदे उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणाल्या की, पावसाळा संपल्यानंतर धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे पाऊस थांबल्यानंतर बुजविण्यात येतील, मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी मुख्य विभागाला निवेदन देण्यात येईल. भारती विद्यापीठ पोलीस वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक चुडप्पा म्हणाले की, कात्रज चौक येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूकडील सर्विस रस्ता तत्काळ तयार करण्यात यावा. महानगरपालिकेमार्फत रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावी, अशी सूचना केली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऍड. दिलीप जगताप यांनी केले.