मुंबई – पक्षाने माझ्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. मी पक्षनेतृत्वावर नाराज किंवा निराश नसून मला प्रमुख पदे दिली आहेत. मला उपमुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते करण्यात आले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अजित पवार कार्यक्रम अर्धवट सोडून बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रावादीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील बोलले. त्यांनी महाराष्ट्राची भूमिका मांडली. तिथे बोलायचे की नाही हे आम्ही ठरवले नव्हते. त्यामुळे मी बोललो नाही. मात्र, कारण नसताना चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या.
तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात पक्षाच्या धोरणं, पुढच्या वाटचालीबद्दल सदस्यांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे मी तिथे बोलणे टाळले. तिथे बोलू नका म्हणून कोणी सांगितले नव्हते. वेळेअभावी सुनिल तटकरे आणि वंदना चव्हाणही बोलू शकल्या नाहीत. मी वॉशरुमला जाण्यासाठी बाहेर आलो होतो. आता वॉशरुमलाही जाऊ नये का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मला अजिबात पक्ष डावलत नाही. कार्यक्रम बराच लांबला होता. तीन वाजेपर्यंत कोणी जेवले नव्हते. शरद पवारांच्या भाषणाकडे आम्ही सर्व वाट पाहत होतो. कार्यकर्ते नाराज नाही. त्यांना जे सांगायचे ते सांगितले. त्यामुळे रुसायचा फुगायचा प्रश्नच नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.