जम्मू – ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर तात्पुरती स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी 4,000 हून अधिक यात्रेकरूंचा आणखी एक जथा अमरनाथ मार्गावर रवाना करण्यात आला.
खराब हवामानामुळे ही यात्रा जम्मूहून स्थगित करण्यात आली होती आणि रविवारी खोऱ्यातील बेस कॅम्पमध्ये कोणत्याही तुकडीला पुढे जाण्याची परवानगी नव्हती. 8 जुलै रोजी अमरनाथच्या मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात किमान 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप या दुर्घटनेतील 30 हून अधिक लोकांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही.
दरम्यान, आज सकाळी सीआरपीएफच्या कडक सुरक्षेत 110 वाहनांच्या ताफ्यात भगवती नगर यात्री निवास येथून 12 व्या तुकडीतील एकूण 4,026 यात्रेकरू अमरनाथच्या दिशेने रवाना झाले.
सोमवारी सकाळी पहलगाम मार्गावरील नुनवान बेस कॅम्पमधून यात्रेकरूंच्या ताज्या तुकडीला परवानगी देण्यात आली होती, हे यात्रेकरू मंगळवारी सकाळी पवित्र गुहेत पोहोचणार आहेत. लष्कराने पवित्र अमरनाथ गुहेच्या बाहेर तात्पुरता जिना बांधला आहे. शुक्रवारी ढगफुटीमुळे झालेल्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. अमरनाथ यात्रेत आत्तापर्यंत 1 लाख 13 हजार नागरिकांनी दर्शन घेऊन आपली यात्रा पूर्ण केली आहे. 11 ऑगस्टला यात्रेची सांगता होणार आहे.