इस्लामाबाद – पाकिस्तानातील करोना विषाणूच्या बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असूनही पाकिस्तानने या महिन्याभरापासून लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानमध्ये बाधितांचा आकडा 28 हजारांच्यावर पोहोचला असून आतापर्यंत 618 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन शिथिल केला जाऊ नये, असा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे. तर सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि लॉकडाऊन कायम ठेवावा, अशी मागणी पाकिस्तान मेडिकल असोसिएअशनच्या प्रतिनिधींनी केली आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यास बाधितांची संख्या झपाट्याने वाढेल. कराचीमध्ये एकूण 5 रुग्णालयांमध्ये एकूण 63 रुग्णांची सोय करण्यात आली आहे. जर कराचीतील स्थिती बिकट बनू शकते, तर अन्य शहरातील स्थितीही बिघडू शकते, असे डॉ. इकराम तुनियो यांनी सांगितले. कराचीमध्ये शनिवारी करोनाची लागन झालेल्या 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
सिंध प्रांतात पीर जो गोठ झोपडपट्टीतील सुमारे 289 ते 350 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे सरकारचे प्रवक्ते मुरलाझा वाहाब यांनी सांगितले आहे. तर पंजाबप्रांतात गेल्या 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरातील बाधितांचा आकडा 28,582 इतका झाला आहे. पंजाबमध्ये 10,471, सिंध 10,771, खैबर पख्तुनवा 4,327, बलुचिस्तान – 1,876, इस्लामाबाद 609, गिलगिट-बाल्टीस्तान-421 आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये 87 रुग्ण आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर देशभरात 618 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक प्रांतांमध्ये 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र किरकोळ व्यवसायिकांना आठवड्यातील 4 दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाजी मार्केट, दुकाने, बेकरी, केशकर्तनालये यांना लॉकडाऊनमधून सूट दिली गेली आहे. डॉक्टरांव्यतिरिक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही लॉकडाऊन शिथिल केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.