मुंबई – दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाचा आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सभागृहात मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आज मणिपूर जळत आहे, तेथे दोन समुदाय एकमेकांशी भांडत आहेत, महिलांशी गैरवर्तन केले जात आहे. देशातील जनता अशीच आपसात भांडत राहिली तर भारत विश्वगुरू कसा होणार? असा सवाल देखील केजरीवाल यांनी उपस्थित केला.
याशिवाय त्यांनी महिला कुस्तीपटूंचा मुद्दाही उपस्थित केला.गलवानमध्ये चिनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. यावर अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान कोणत्याही मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत, तसेच ते मणिपूरच्या मुद्द्यावर देखील बोलत नाहीत अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सभागृहात म्हणाले, “भाजपचे आमदार स्पष्टपणे सांगत आहेत की त्यांचा मणिपूरशी कोणताही संबंध नाही. मणिपूरशी त्यांचा कोणताही संबंध नाही, असा हा पंतप्रधान मोदींचा संदेश आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. 6,500 एफआयआर दाखल आहेत. 150 हून अधिक मारले गेले आहेत पण पंतप्रधान गप्प आहेत.
द्वारका द्रुतगती मार्गाचा मुद्दा उपस्थित केला
शेतकऱ्यांची देखील पंतप्रधानांना काही किंमत नाही. हरियाणात हिंसाचार झाला, पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. आता कॅगचा अहवाल आला आहे की, केंद्र सरकारने द्वारका एक्स्प्रेस वेसाठी 250 कोटी रुपये खर्च केले आहेत, जो 18 कोटींमधून बांधायचा होता. आता संपूर्ण देशात पंतप्रधानांची चर्चा आहे.असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.