प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – “आमच्या आजीच्या घरी गणपती बसवायचे. पण, आम्ही हायस्कूलमधील मित्र गणपती बसवायचो. त्यावेळी शरद पवार साहेबांकडे भेटायला आलेल्यांकडून एक-एक रुपया वर्गणी घ्यायचो. कोणी पाच रुपये दिले तर बोलायलाच नको,’ अशा शब्दांत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गणेशोत्सवाच्या आठवणींना उजाळा दिला. तर, “आता राज्यभर गणपतींच्या आरतींसाठी फिरत असलो तरी शेवटचे गणपती 1982 मध्ये पाहिले होते. त्यानंतर पुन्हा वेळच नाही मिळाला,’ असेही ते म्हणाले.
पवार यांनी विसर्जनाच्या दिवशी सकाळी 6 वाजताच गणेशमंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर जवळपास सहा तास ते गणेशमंडळांना भेट देत होते. तर काही वेळ त्यांनी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीतही सहभाग घेतला. मधल्या वेळेत त्यांनी राजकीय पक्षांच्या सदस्यांशीही गप्पा मारल्या. मंडई येथे मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होण्यापूर्वी काही वेळ पवार तेथील मांडवात बसले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधी तसेच कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. “राजकरणात आल्यापासून गणपतीच्या आरती करायला जातोय. मात्र, गणपती बघायला फिरता येत नाही. गर्दीच एवढी होते की पाहताच येणार नाही. मात्र, 1981-82 मध्ये कोल्हापूरला असताना आम्ही मित्र मित्र रात्री पुण्यात गणपती बघायला यायचो आणि सकाळी निघून जायचो.’ असे सांगत तब्बल 40 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
“…त्याला खासदार करा, मी शेती करतो’
“राजकीय नेते झाल्याने गणपती पाहता येत नाही. गर्दी होते. माध्यमे आसपास असतात, त्यामुळे पाहता आले नाहीत का?’ असे विचारले असता, दादांनी आपल्या खासदारकीच्या उमेदवारीचा गमतीदार किस्सा सांगितला. “1987 मध्ये मला खासदार करावे म्हणून काही नेत्यांनी पवार साहेबांकडे आग्रह धरला. पण साहेबांनी थेट नकार न देता, “अजितला खासदर करा. मी गावी जाऊन शेती करतो’ असे सुनावले. त्यानंतर पुन्हा या पदाधिकाऱ्यांनी कधीच शब्द काढला नाही. मात्र, 1987 ची खासदारकी 1991 पर्यंत चालली. पण मी दिल्लीत रमलो नाही, मी आपला महाराष्ट्रातच रमलो’ असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.