प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 – सन 2019 नंतर दोन वर्षांच्या “गॅप’ हा करोनाच्या भीतीने गेला. मात्र, 2022 साल हे उल्हास, उत्साह आणि मुळात निर्भीड वातावरण घेऊन आले आणि गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला. नऊ दिवस जल्लोषात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’, “बाप्पा हळू हळू चाला, वाटे मोरया बोला’ असा नादघोष करत शुक्रवारी निरोप देण्यात आला. “बाप्पा हळू हळू चाला..’ असे म्हणताना खरोखरच ही मिरवणूक कूर्मगतीने सुमारे 32 तास चालली. शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक शनिवारी सायंकाळी 6 वाजून
3 मिनिटांनी संपली. पोलिसांच्या नियोजनाच्या अभावामुळे मिरवणुकीला प्रचंड वेळ लागला.
मंडईतील टिळक पुतळा चौकात सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते मानाच्या गणपतींची पूजा करण्यात आली. वातावरण उत्साहाने अक्षरश: ओसंडून वाहात होते. मिरवणुकीला सुरुवात होताना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च-तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार रोहित पवार, माजी मंत्री आणि युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कॉंग्रेससह शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी आणि उल्हास पवार उपस्थित होते.
सन 2019 नंतर करोना-लॉकडाऊन, निर्बंध, अनेकांच्या घर-नातेवाईक-मित्रमंडळींमध्ये करोनामुळे निधन या सगळ्या भीतीदायक वातावरणात बाप्पांचा जल्लोष झालाच नाही. हे दोन वर्षांचे आरोग्यावरचे विघ्न टळले आणि यावर्षी अगदी जल्लोषात सर्व सार्वजनिक मंडळे उत्साहाने रस्त्यावर उतरली. यंदा विसर्जन मिरवणूक लांबणार याचा अंदाज होताच, त्यातून निर्बंध लादू नयेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनीही दिल्या. त्यामुळे 2019 मध्ये 24 तास 7 मिनिटे चाललेली मिरवणूक यंदा तब्बल 32 तास चालली. यामध्ये 4 लाख 30 हजार 091 घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये 1 लाख 22 हजार 341 बाप्पांचे विसर्जन झाले.तसेच तर 3 हजार 566 सार्वजनिक मंडळांच्या (कॅन्टोन्मेंटसह) बाप्पांचे विसर्जन झाले. त्यातूनही मानाच्या पहिल्या पाच गणपतींची मिरवणूक 10 तास चालली. या गणपतींशिवाय बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळालाही निघायला उशीर झाला. वरीलप्रमाणे ओळीने निघणाऱ्या या मंडळांमध्ये सर्वांत शेवटी निघणाऱ्या दगडूशेठ मंडळाचा बाप्पा सकाळी सहा-साडेसहा वाजता विसर्जित होत असे. मात्र, यंदा बेलबाग चौकातूनच त्याची मिरवणूक 7 वाजून 45 मिनिटांनी निघाली. त्यामुळे सकाळी सुमारे 11 वाजून 15 मिनिटांनी त्याचे विसर्जन करण्यात आले. वास्तविक या बाप्पांची मिरवणूक पाहण्यासाठी पहाटे प्रचंड गर्दी होते. या मंडळाचा विसर्जन रथ हे मुख्य आकर्षण असते. रात्रीचा अंधार आणि पहाटेचा उगवतीचा प्रकाश, धुंद वातावरणात हे रथ अतिशय मोहक दिसतात. परंतु यंदा ही रोषणाई लक्ष्मी रस्त्यावरील भक्तांना पाहता आली नाही.
पोलिसांचे नियोजन सपशेल चुकले
दोन वर्षांनी उत्सव होत असल्याने जल्लोष होताच परंतु मिरवणूक लांबणार, याची कल्पना पोलिसांना होती. तरीही नियोजनाचा अभाव यामध्ये दिसून आला. बॅरिगेटस व्यवस्थित नव्हते, बंदोबस्त नाही, मंडळांना समजावून पुढे नेणे, दोन मंडळांमधील अंतर कमी करणे, वादनाला बराच वेळ देणे या सगळ्या प्रकारांमुळे ही मिरवणूक लांबली. रात्री ती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांची आणि कार्यकर्त्यांची वादावादी झाली. ज्या मंडळांना जास्त वेळ लागतो, त्या मंडळांच्या प्रतिनिधींशी पोलिसांना समन्वयही साधता आला नाही. त्यामुळे त्यांना मार्ग मोकळाही करून देण्यात आला नाही. वास्तविक लक्ष्मी रस्त्यावर अनुभवी अधिकाऱ्यांची वानवा असल्याने नियोजन फसल्याची चर्चाही सुरू होती.
टिळक चौकात महापालिकेच्या
मंडपात नेत्यांऐवजी प्रशासक
टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) दरवर्षी महापालिकेचा मंडप असतो. त्यामध्ये महापौरांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, राजकीय मंडळी बसलेली असतात. महापौरांच्या हस्ते मानाच्या गणपतींच्या आणि एकूणच गणेश मंडळांच्या अध्यक्षांना मानाचे श्रीफळ दिले जाते. मात्र, आता महापालिकेची कार्यकारिणी बरखास्त झाल्यामुळे आणि महापालिका आयुक्तच प्रशासक म्हणून आल्याने या पंडॉलमध्ये महापालिकेचे अधिकारीच बसले. अतिरिक्त आयुक्त डॉ. रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या पाचही गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते श्रीफळ देण्यात आले. “मान मिळणे यापेक्षा मुळात या विसर्जन मिरवणुकीत या ठिकाणी उपस्थित राहून सहभागी होता आले याचा आनंद आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बांधीव हौदात विसर्जन87 हजार 948
लोखंडी टाक्यांचे हौद2 लाख 1 हजार 447
मूर्तीदान85 हजार 993
फिरत्या हौदात विसर्जन झालेल्या मूर्ती54 हजार 703
एकूण विसर्जित मूर्ती4 लाख 30 हजार 91
मागील पंधरा वर्षांतील
विसर्जन मिरवणूक वेळ
वर्षकालावधी
200730 तास 20 मि.
200828 तास 15 मि.
200925 तास 45 मि.
201027 तास 25 मि.
201127 तास 20 मि.
201228 तास 15 मि.
201327 तास 25 मि.
201429 तास 12 मि
201528 तास 25 मि.
201628 तास 30 मि.
201728 तास 05 मि.
201826 तास 36 मि.
201924 तास 07 मि.
2020करोनामुळे मिरवणूक नाही
2021करोनामुळे मिरवणूक नाही
202232 तास