मुंबई – महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनात आमदारांना मुंबईत मिळणाऱ्या मोफत घरांचा मुद्दा चांगलाच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीही मुंबईत हक्काचं घर देणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर एकच राजकारण पेटलं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईत सदनिका देणार असं म्हटलं. पण सगळ्यांना त्या सदनिका फुकट देणार असंच वाटलं. त्याची काही किंमत आहे. सगळ्यांना ती घरं मिळणार नाही. मी, माझी पत्नी यांच्या नावे घर मिळणार नाही. काही लोकप्रतिनिधी असे आहेत ज्यांना जनतेच्या कामानिमित्त मुंबईत यावं लागतं. जे गरीब आमदार आहेत त्यांना ती घरं देण्याचा आपण प्रयत्न करतोय,” असं अजित पवार म्हणाले.
आपण जवळपास ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. परंतु काही आमदारांनी याला विरोध केला होता.
याआधी मंत्री जितेंद्र आव्हान यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ”आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांसंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो की सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.