जायकवाडीकडे 2 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग ः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
राहुरी (प्रतिनिधी) – दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून मंगळवारी (दि. 1) सकाळी दहा वाजता 11 दरवाजांतून 2 हजार क्यूसेक्सने जायकवाडीकडे पाणी झेपावले. मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी कळ दाबून पाणी नदीपात्रात सोडले.
उजव्या कालव्यातून वीजनिर्मितीसाठी पाचशे, तर मुसळवाडी साठवण तलावासाठी 120 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.तसेच वांबोरी लिफ्ट योजनेकरिता पाणी सोडले जाणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या अकरा दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरणाकडे 3 हजार क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवल्यानंतर पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी मुळा पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे, भाऊसाहेब गुलदगड, सलीम शेख, गुलाब शेख, भाऊसाहेब कोळेकर आदी हजर होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला आहे. त्यामुळे जलपूजन समारंभ झाला नाही. 25 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम राखून धरणातील आवक लक्षात घेवून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे.
पत्रकारांमुळे वाचला तरुणाचा जीव
मुळा धरणाच्या अकरा दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. धरणातून सोडलेले पाणी पाहण्यासाठी एक तरुण धरणाच्या दरवाजांच्या मधोमध गेला होता. परंतु येथे वृत्तांकन करणासाठी आलेल्या पत्रकारांनी तत्काळ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे पुन्हा दरवाजे बंद करून या तरुणाची सुटका करण्यात आली.