कोपरगाव, – निळवंडेच्या डाव्या कालव्यावर ठाण मांडून बसून डाव्या कालव्याचे पाणी कोपरगाव मतदारसंघातील मागील अनेक दशकापासून कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या भागात आणणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी आता हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचेल, यासाठी निळवंडेच्या चाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले आहे.
हिवाळी अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतांना शेती सिंचनाचा महत्वाचा प्रश्न उपस्थित करून निळवंडे कालव्याच्या चाऱ्यांच्या प्रश्नाकडे देखील सभागृहाचे लक्ष वेधले आहे. जवळपास ५३ वर्षांपासून कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील बहादराबाद, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर व मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावातील साठवण बंधारे, पाझर तलाव भरले. पाच दशकांहून अधिक कालखंडानंतर निळवंडे लाभक्षेत्राच्या भागातील नागरिकांना निळवंडेचे पाणी पहायला मिळाले असले तरी हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणे देखील अत्यंत गरजेचे आहे.
निळवंडे धरणाचे व कालव्यांचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र अजूनही मुख्य वितरिकांच्या अर्थात चाऱ्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यावर्षी जरी या गावातील नागरिकांना पिण्यासाठी निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांच्या माध्यमातून पोहोचले असले तरी हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत लवकरात लवकर कसे पोहोचे, यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी विधानसभेत केली आहे.
कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच गावांना टेल टू हेड निळवंडेच्या पाण्याचा लाभ देण्यासाठी वितरिकांची कामे होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे हा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी विधानसभेत उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्याबद्दल कोपरगाव मतदार संघ व राहाता तालुक्यातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.