राहाता -पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन तसेच शेतकरी मेळाव्याने आयोजन शिर्डीत करण्यात आले आहे, या वेळी एक लाख नागरीक उपस्थित राहणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
निळवंडेचे लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. शिर्डीतील साई संस्थानने उभारलेल्या दर्शनरांग प्रकल्पाचे उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 600 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या टर्मिनल कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
त्याबरोबर शिर्डी देखील साईबाबा शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण, राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो किसान योजनेचे लोकार्पण यावेळी होणार असून शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण देखील यावेळी मोदी यांच्य हस्ते होणार आहे. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी काकडी विमानतळा शेतकरी भव्य प्रागंणात मागील आठ दिवसापासून सुरु असून, सुमारे 1 लाख नागरीक सभेला उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेवून या सभेचे परिपुर्ण नियोजन करण्यात आले.
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेची तयारी करण्यात आली असून, आज त्यांनी पुन्हा सभास्थळी जावून या तयारीचा आढावा घेतला. या वेळी खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.
सभास्थळी तीन मोठे सभामंडप उभारण्यात आले असून, प्रत्येक सभामंडपात वीस स्क्रीनची उभारणी करण्यात आली आहे. सभामंडपातच उपस्थितांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पद्मभूषण डॉ.विखे पाटील स्वप्न पूर्ण
नगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी निळवंडे धरण व्हावे. यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची आग्रही भूमिका होती. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावाही झाला. परंतू अनेक वर्षे तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले गेले. परंतू समस्या लक्षात न घेता केवळ राजकीय व्देषापोटी निळवंडे प्रश्नावरून केवळ विखे कुटूंबियांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.परंतू राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळाली. 5 हजार 177 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यताही मिळाली. सर्वांच्या प्रयत्नाने आज हा प्रकल्प आज पुर्ण होत आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी उपस्थिती ही आनंदाची बाब आहेच,खासदार साहेबांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे समाधान आहे,असे मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.