नगर -शिक्षक बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कारभार अत्यंत सभासदांभिमुख व समाजात शिक्षकांची प्रतिमा बुलंद करणारा आहे. भ्रष्टाचाराचा कोणताही मुद्दा या संचालक मंडळाने हाताळलेला नाही.
त्यामुळे कारभारावर नावे ठेवण्यासाठी मुद्देच नसल्याने अहवालातील फोटोंना अल्बमची उपमा देण्याचा केविलवाणा प्रयत्न गुरुकुल मंडळाच्या नेतेमंडळींनी केला आहे. मात्र, एकदा त्यांनी इतिहासात जाऊन आपल्या कार्यकाळातील अहवाल तपासून पहावेत, असा सल्ला गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी दिला.
रविवारी होणाऱ्या शिक्षक बॅंकेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात पत्रकबाजीला उधाण आले आहे . सत्ताधारी व विरोधी गटांकडून वेगवेगळे आरोप एकमेकावर केले जात आहेत. काल गुरुकुल मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर यांनी सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाच्या कारभाराबद्दल अनेक आक्षेप घेतले आहेत.
त्याला साळवे यांनी उत्तर दिले आहे. फोटो नियमानुसार घेतलेले आहेत. अनावश्यक फोटोंना कट लावण्यात आला असल्याचे ते म्हणाले. बॅंकेकडून परागंदा शिक्षकांचे हफ्ते, सभासद मयत कर्ज निवारण निधीमधून तात्पुरते भरण्यात येतात. तसेच जे सभासद नोकरीवर हजर झाले आहेत त्यांच्याकडून पैसे वसूलही करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.
परागंदा शिक्षकांच्या कर्जाचे हफ्ते मयत सभासद कर्ज निवारण निधीतून भरण्याच्या प्रक्रियेला आता आरबीआयने आक्षेप घेतलेला असल्याने ती पद्धत बंद झाली आहे. मात्र, सरसकट हप्ते भरण्यात आलेले जमीनदारांना त्रास होऊ नये, म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून मयत सभासद निधीमधून ते भरले जातात.
मात्र, ते माफ केले जात नाहीत. याची शहानिशा विरोधकांनी केली. आमच्या संचालक मंडळाच्या कारभाराला नाव ठेवणाऱ्यांनी आपल्या कार्यकाळातील पाच वर्षाचा काळाकुट्ट कारभार आठवावा. बजाज एलायंझ, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, बोनस, रजा पगार, मेहेनताना व अशा अनेक गोष्टी आठवाव्यात असे ही ते म्हणाले.
या पाच वर्षाच्या काळात बोनस, मेहनताना, रजेचा पगार, या सर्व गोष्टींना फाटा देऊन सभासदाभिमुख कारभार केल्याचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे यांनी सांगितले.आपल्या काळातील कारभाराचे मार्जिन किती टक्के होते? हेही आपण तपासून पहावे, असा खोचक सल्लाही गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिला आहे.
===============