संगमनेर – तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक परिसरातील विहिरीत अवैध वाळू वाहतुकीची पिकअप पडल्याने झालेल्या अपघातात वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाट्यमय घडामोडींनंतर पोलीस व महसूलच्या निगराणीत असलेला अपघातग्रस्त पिकअप चोरीला गेल्याची फिर्यादच मंडळ अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यामुळे या घटनेस महसूल विभागच जबाबदार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकाचा बळी गेल्यानंतर उशिरा का होईना महसूल प्रशासन जागे झाले असून महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शनिवारी (दि. 26) पहाटे चारच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक परिसरातील विहिरीत पिकअप पडल्याने एकाचा मृत्यू झाला होता तर चौघे जण बचावल्याची घटना होती. या घटनेत गोरख नाथा खेमनर (वय २३, रा. डिग्रस, ता संगमनेर) या पिकअप चालकाचा पाण्याचा बुडाल्याने मृत्यू झाला होता. दुर्घटनेपूर्वी दोन दिवस आगोदर संबंधित पिकअप मंगळापूरच्या गावकऱ्यांनी दोन तलाठ्यांच्या ताब्यात दिला होता, मग काही कारवाई न होता ती पिकअप पुन्हा रस्त्यावर धावली कशी ? त्यामुळे या घटनेला महसूल विभाग जबाबदार असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. खेमनरचा खरा मारेकरी म्हणून गावकऱ्यांनी महसूल विभागालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन बारकू भोकनळ आणि शिवाजी राधाकिसन घुले ( दोघेही रा. मंगळापूर, ता. संगमनेर) या दोघांनी जुन्या पोलीस लाईनमधून वाळूने भरलेली पिकअप चोरून नेल्याची फिर्यादच शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
गोरख नाथा खेमनर (वय २३, रा. डिग्रस, ता संगमनेर) या पिकअप चालकाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला होता. दोन तलाठ्यांच्या ताब्यात दिलेली त्यांनी ती पिकअप जुन्या पोलीस लाईनमध्ये लावली होती. कायदेशीर रखवालीतून ती पिकअप संबंधित तलाठ्यांना हाताशी धरून तेथून काढून नेल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात गोरख खेमनर या मजूर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असला तरी त्याच्या मृत्यूस महसूलच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारी ही देखील तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये.? असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहे.