नगर – मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने ठिकठिकाणी जाळ-पोळ, तोडफोडीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्वच बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मंगळवारपर्यंत काही ठिकाणी बससेवा सुरू होती. मात्र बुधवारी पूर्णपणे बससेवा बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातून शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या, तसेच परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आहे. याशिवाय सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. बुधवारी 95 टक्के फेऱ्या बंद होत्या.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी तोडफोड झाल्याने विभागीय कार्यालयाने मंगळवारी बहुतांश ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या.त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, अद्याप आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बससेवा बंद असलेल्या संधीचा फायदा खासगी वाहतुकदारांनी घेतला आहे. त्यांच्याकडून अवाच्या सव्वा भाडे आकारून नागरिकांची लुट मोठ्या प्रमाणावर होत आहे.
विद्यार्थ्यांचे हाल
सध्या विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु आहेत. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बसअभावी हाल झाले. अनेक विद्यार्थी दुपारी पेपर सुटल्यानंतर बसची वाट पाहत होते. याशिवाय दिवाळी खरेदीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.