नगर – यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने नगर दक्षिण भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप पिके कशीबशी जगली. त्यातून 1 कोटी 22 लाख मेट्रीक टन चारा उत्पादन झाले असून रब्बीमध्ये सुमारे 30 लाख 37 हजार मेट्रीक टन चार उपलब्ध होईल. तरी जिल्ह्यातील जनावरांची संख्या व त्यांना लागणारा चारा याचा विचार करता ऐन उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील धरण, नद्यांच्या बॅकवॉटरला असलेल्या गाळपेर जमिनीमध्ये चारा पिक घेण्याचे नियोजन केले असून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्ट महिना पुर्णपणे कोरडा गेला होता. सप्टेंबर महिन्यात देखील 20 दिवस पाऊस नव्हता. या काळात काही भागात तुरळक पाऊस पडला. पाऊस नसल्याने खरीप हंगामातील विविध पिके धोक्यात आली होती. पावसाळ्यात पाणीटंचाईमुळे टॅंकरद्वारे अनेक गावांना पाणीपुरवठा होत होता. त्यावेळी जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याबाहेर चारा विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. पाणी असलेल्या भागात चारा पिके घेण्याचे नियोजन करण्यात आले. मोफत चारा बियाणांचे वाटप देखील करण्यात आले. मात्र सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीपाला जीवदान मिळाले. अर्थात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामाच्या उत्पादनात मोठी घट झाली.
जिल्ह्यात उत्तर नगर जिल्ह्यातील धरणे भरली असली तरी दक्षिण नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई भासणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजन सुरू करून टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. खरीप हंगामातून 1 कोटी 22 लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध झाला असून रब्बी हंगामातून 30 लाख 37 लाख मेट्रीक टन असा ओला व सुका चारा उपलब्ध होईल, असा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. पुढील काही महिन्यांसाठी अंदाज 1 कोटी 50 लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध होईल. अशा परिस्थिती असली तरी जिल्ह्यात 30 लाखहून अधिक लहान मोठी जनावरे आहेत.
मोठ्या जनावरांना प्रतिदिन 15 किलो, लहान जनावरांना 7.50 किलो तर शेळ्या मेंढ्यांना 3.50 किलो चारा लागणार आहे.ऐन उन्हाळ्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने धरण व नद्यांच्या बॅकवॉटरला असलेल्या गाळपेर जमिनीतून चारा उत्पादन करण्याचा प्रस्ताव केला आहे. जिल्ह्यात मुळा, प्रवरा, आढळा, जायकवाडी, घोड, आदी धरणाच्या बॅकवॉटरला मोठ्या प्रमाणावर गाळपेर जमीन आहे. सुमारे 1 हजार 200 हेक्टर जमीन गाळपेर असून तेथे चारा पिके घेतल्यास सुमारे 1 लाख 35 हजार मेट्रीक टन चारा अतिरिक्त उपलब्ध होऊ शकतो. त्याचा फायदा चाराटंचाईवर मात करण्यासाठी होईल. तसा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक असून लवकरच गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्याचे नियोजन करण्यात येईल.
शेतकऱ्यांमार्फतच चाऱ्याची विक्री
शेतकऱ्यांना गाळपेरमध्ये चारा पिके घेण्याचे सांगण्यात येणार असून ती पिके घेऊन त्यांच्या मार्फत चाऱ्याची विक्री केली जाणार आहे. अर्थात गाळपेर जमिनी या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत या गाळपेरमध्ये चारा पिके घेण्याचे नियोजन होणार आहे.