कोल्हार – सध्या उसाचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे वाढलेल्या उसाच्या शेतात आश्रय घेणारे बिबटे आता बाहेर पडू लागले असल्यामुळे बिथरलेल्या बिबट्यांनी आता वाड्या- वस्त्यांवर राहणाऱ्या पशुधनाला आता आपले भक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे शेतकरी भयभीत झाला असून पशुधनाचे रक्षण करण्याचे आवाहन आता शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे याचा अनुभव शेतकऱ्यांना आता येऊ लागला आहे. गावातील कोंबडवाडी येथे गट नंबर ७७६ मध्ये वस्ती करून राहत असलेले प्रशांत शिरसाठ यांचे कुटुंब रात्री गाढ झोपेत असताना दारासमोर बांधलेल्या तीन गायी, एक सहा महिन्यांची कालवड आणि एक शेळी यापैकी सहा महिन्याच्या कालवाडीवर बिबट्याने ताव मारला. ही घटना रात्री एक वाजता घडली असल्याचा अंदाज कुटुंबाने वर्तवला असून सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असल्याचे प्रशांत शिरसाठ यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे तांभेरे रोड नजीक जाधव वस्ती परिसरात वास्तव्यास असलेले सावळेराम चिखले यांच्या गोठ्याचे सात फूट उंचीचे कुंपण पार करून बिबट्याने आत प्रवेश केला. जवळपास १० गायी आणि १० ते १२ शेळ्या बांधलेल्या गोठ्यातील एका शेळीवर बिबट्याने ताव मारला असल्याची घटना दि. १ जानेवारीच्या रात्री घडली. या घटनांमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे. त्यातच सध्या गहू, हरभरा, चारा पिके यांना रात्री- अपरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागत असल्यामुळे यासह पशुधनाचे रक्षण करण्याचे मोठे आवाहन शेतकऱ्यांसमोर उभे राहिले असून तात्काळ या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतं आहे.