शिर्सुफळसाठी खडकवासला पाटबंधाऱ्याकडे शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन
रावणगाव- येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मिळून आज गुरुवार (दि. 16) शिर्सुफळ तलावामधून रब्बी हंगाम आवर्तन मिळण्यासाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संपतराव आटोळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना शाखाधिकारी रावणगांव यांच्यामार्फत निवेदन अर्ज दिला आहे.
या वर्षीचा रब्बी हंगाम सुरू होऊन तीन-चार महिने उलटून गेले तरी शिर्सुफळ तलावातून रावणगाव (ता. दौंड) येथील शित फाट्याला अनेकवेळा मागणी करून देखील एकही आवर्तन न सोडल्याने त्या परिसरातील पिके सुकली आहेत, ती काही दिवसांतच जळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रावणगाव परिसरातील मेंढवाडगा, पूर्ववस्ती, रांधवणवस्ती येथे सध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असल्याने गहू, ज्वारी, हरभरा, उस पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने सर्व संतप्त ग्रामस्थांनी मिळून एका अर्जाद्वारे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना रावणगाव येथील कार्यालयाचे शाखाधिकारी सी. आर. आटोळे यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन निवेदन अर्ज दिला. याबरोबरच पाण्याचे आवर्तन सोडले गेले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संपतराव आटोळे, प्रहार संघटनेचे दौंड तालुका कार्याध्यक्ष ए. जे. रांधवण, सागर आटोळे, दादा आटोळे, भारत आटोळे, नवनाथ आटोळे, आप्पा भोपाळ, चेतन गावडे, भाऊसाहेब गावडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
- शिर्सुफळ तलावामधून शित फाट्याला रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने सोडणे आवश्यक आहे; परंतु यासाठी वारंवार मागणी करावी लागते तेव्हा पाणी मिळते. यापुढे या आवर्तनासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– संपतराव आटोळे, माजी संचालक भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस