नवी दिल्ली – गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या पक्षाने देशभर अभूतपूर्व यश मिळवलेआहे. ७५ वर्षांमध्ये देशातल्या इतर कुठल्याही पक्षापेक्षा आपण चांगली कामगिरी केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पंजाबमध्ये आप सरकारने केलेले काम पाहता असे लक्षात येते की संपूर्ण राज्यात आपली सत्ता असेल तर अधिक वेगाने काम करता येईल अशी भावना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. दहा दिवसांच्या विपश्यनेनंतर केजरीवाल पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत यानिमित्ताने दिले आहेत.
आज देशाच्या राजकारणात आपचा मोठा प्रभाव पडतो आहे. देशात पहिल्यांदाच देशातले विरोधी पक्ष शाळा आणि रुग्णालयांवर बोलू लागले आहेत. यातल्या काही लोकांनी आपला गॅरंटी हा शब्द आणि जाहिरनामादेखील चोरला आहे. आता हे लोक मोदी की गॅरंटी आणि काँग्रेस की गॅरंटी असा प्रचार करू लागले आहेत. या लोकांनी गॅरंटी दिली खरी, परंतु आश्वासने पूर्ण केली नाहीत. कारण या लोकांचा हेतू स्वच्छ नाही. मात्र, आपने दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे असा दावा करत त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला.
केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि १२ वी राष्ट्रीय परिषद पार पडली. ऑनलाईन माध्यमातून पार पडलेल्या या दोन्ही बैठकांमध्ये पक्षाचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. संदीप पाठक हे केजरीवाल यांच्याबरोबर सभागृहात उपस्थित होते.
आपच्या काही नेत्यांना झालेल्या अटकेचा संदर्भ देताना ते म्हणाले की, आपले पाच नेते तुरुंगात आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तुम्ही मुलांना चांगले शिक्षण देण्याबद्दल, रुग्णांवर मोफत उपचार करण्याबद्दल बोलू लागलात तर तुम्हाला तुरुंगात तर जावेच लागेल आणि आपण यासाठी तयार असले पाहिजे. देशभरात आज आपला पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. जनतेच्या भल्यासाठी आपण जो मार्ग निवडला आहे, त्यावर चालत राहिलो तर आपल्याला तुरुंगात तर जावेच लागेल असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
देशातल्या दोन मोठ्या पक्षांनी देशावर ७५ वर्षे राज्य केले. हे लोक इतक्या सहजपणे सत्ता सोडणार नाहीत. प्रत्येकाला ज्याचा त्याचा संघर्ष करावा लागतो. परंतु, निराश होण्याची आवश्यकता नाही. तुरुंगात असलेल्या आपल्या नेत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, त्याच दिवशी मला त्यांचा मेसेज आला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, काहीच अडचण नाही, सगळं काही ठीक आहे. मला जितके दिवस तुरुंगात ठेवलं जाईल, तेवढे दिवस मी इथे राहीन. हा संपूर्ण खटला बोगस असून माझा लढा चालूच राहील.