स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असते. प्रत्येक ताज्या घडामोडीवर ती भाष्य करते. कलाकारांनी व्यक्त व्हायलाच पाहिजे त्याला कोणाची हरकत नाही. त्यांनी चांगले काय आणि वाईट काय, हेही सुचवले किंवा समजावले पाहिजे. कारण चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे अनुकरण करत असतात. मात्र अगोदर कलाकारांना मुळात घटना काय आहे, ती माहीत असावी.
स्वराच्या बाबतीत बऱ्याचदा असा गोंधळ होताना दिसतो. मूळ घटना कदाचित तिला माहीत नसते की ती जाणूनबुजून गोंधळ निर्माण करते असा प्रश्न पडावा अशा प्रतिक्रिया ती जाहीरपणे देत असते. उत्तर प्रदेशच्या एका ठिकाणी म्हणजे गाझियाबादमधील घटना आहे. त्यात दोघे तिघे एका ज्येष्ठ नागरिकासोबत गैरवर्तणूक करताना दिसत आहेत. स्वराने तो व्हिडिओ कुठेतरी पाहिला. कदाचित तिला चुकीची माहितीही दिली गेली असावी. त्यावर कोणतीही शहानिशा न करता तिने त्याला धार्मिक रंग देऊन टाकला आणि त्याकरता एका संघटनेकडे बोटही दर्शवले.
मुळात हा आपसातला वाद होता. त्यात धर्म आणि राजकारण आणण्याची काही गरज नव्हती. पण स्वराने ते केले. बऱ्याचदा ती असे करते. ती म्हणते त्याप्रमाणे ही धार्मिक बाब असेल आणि त्याचे राजकारण होत असेल तर त्यावर कायद्याने इलाज नक्कीच व्हायला हवा. मात्र जर तसे काहीही नसेल आणि केवळ दोन व्यक्तींमध्ये अचानक उद्भवलेला वाद असेल तर त्याला दोन समुदायांतील संघर्षाचे स्वरूप देऊन ते सोशल मीडियावर पसरवणे नक्कीच धक्कादायक ठरते. असले प्रकार करणाऱ्यांकडेही कायद्याने लक्ष देण्याची गरज आहे.