बारामती, (प्रतिनिधी)- दौंड तालुक्यातील यवत, गाडीमोड, बोरिएंदी, या गावात ऍड. प्रियदर्शनी कोकरे यांनी दौरा केला. दौंड तालुक्यातील जनतेने घराणेशाहीला बाजूला ठेऊन आणि आपल्या न्याय हकांसाठी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी प्रियदर्शनी कोकरे यांनी केले.
काही दिवसांपूर्वी कोकरे यांनी बारामती लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती. त्यानिमित्ताने त्यांनी दौंड तालुक्यात दौरे सुरु केले आहेत. इंदापूर, बारामती, दौंड, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर या मतदारसंघामध्ये संदर्भात गाव चलो अभियानाच्या माध्यमातून ओबीसी, बहुजन बांधवांना एकत्रीत करुन पुढील दिशा ठरवण्यासाठी गावनिहाय बैठका सुरु आहेत.
यावेळी कोकरे म्हणाल्या की, ओबीसी बहुजन समाजाने आता जागरूक झाले पाहिजे. जास्तीत जास्त आपले लोकसभा आणि विधानसभेला प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. घराणेशाहीला विरोध करणे गरजेचे आहे, गेली 40 वर्षे पवारांच्या घरात सत्ता आहे, त्याच लोकांना किती दिवस संधी द्यायची. सर्वसामान्य घरातील लोकांनी काय सतरंजा उचलायच्या का, असा सवाल यावेळी ऍड. कोकरे यांनी केला.
दौंडचे रस्ते बिकट
ओबीसी, बहुजन समाज, वंचित घटक, बांधवांमध्ये एकजुटीसाठी गाव चलो अभियानाच्या माध्यमातुन यवत येथे त्या बोलत होत्या. ओबीसी, भटके विमुक्त, बहुजन बांधवांच्या गावा-गावांत जाऊन जनजागृती करण्यासाठी बैठका सुरू असल्याची माहिती ऍड. कोकरे यांनी दिली. दौंड तालुक्यामधील रस्त्यांची अवस्था फार बिकट आहे, कुल आणि थोरात यांच्या गटांमध्ये तालुका विभागला गेला आहे.
त्यांच्या हेवेदाव्यामुळे तालुक्याच्या विकासावर परिणाम झाला आहे, बोरिएंदी गावाला जाण्यासाठी रस्त्याची अवस्था दयनीय आहे, गावाकडे जाणारा पूल धोकादायक झाला आहे. लोकांना कसरत करावी लागते, त्यामुळे विकास फक्त कागदावरच झाला का, असा प्रश्न कोकरे उपस्थित केला.