चांदखेड, (वार्ताहर) – जिल्हा परिषद शाळेत सुरुवात केलेल्या पाचवीच्या वर्गातील ७८ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. प्रस्ताव सादर करूनही त्यास शासनाने मान्यता दिलेली नाही. आता आचारसंहिता लागल्याने शाळेला मान्यता मिळण्याचीही शक्यता धुसूर झाली आहे.
चांदखेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ३४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नैसर्गिक वाढीने पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला. त्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग यांना देण्यात आले आहेत.
त्यावर आजतागायत कुठलीच कारवाई झाली नसल्याने पाचवीच्या वर्गातील ७८ विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने पाचवी ते सातवीच्या वर्गाना लवकरात लवकर मान्यता देण्याचे आवाहन चांदखेडच्या सरपंच मीना दत्तात्रय माळी केले आहे.
पाचवीच्या वर्गाला मान्यता न मिळाल्यास या विद्यार्थ्यांना दुसरीकडे शाळेत जावे लागेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता शासनाने वर्गाला मान्यता द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.