पुणे – करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनही १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. शाळांनी यंदा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रभावीपणे ऑनलाईन पध्दत राबविण्यालाच प्राधान्य दिले आहे. मार्च महिन्याच्यापासून करोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे १४ एप्रिल, ३ मे नंतर टप्पा टप्य्याने लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. मुल्यमापनानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार आहे.
दरवर्षी बऱ्याच ठिकाणी नव्याने छोट्या-मोठ्या शाळा सुरु होत असल्याने शाळांची संख्या वाढतच जाते. नवीन व जून्या शाळांमध्ये प्रामुख्याने पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गात नव्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी स्पर्धा लागते. शाळांनी आपआपली विशिष्ट दाखवत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये खेचण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आकर्षक सुविधा, अनुभवी शिक्षक वर्ग, संगणक कक्ष, वाहतुक व्यवस्था, खेळाचे मैदान व साधने, ई – साहित्य उपलब्ध आदीचे आकर्षण पालकांना दाखविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांमधील शिक्षक, कर्मचारी यांच्या कडून पालकांना ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअप करुन ऑनलाईन प्रवेशाची माहिती कळविण्याचा धडाका लावण्यात येऊ लागला आहे. प्रवेशासाठी शाळेच्या परिसरात घरोघरी फिरुन पालकांना माहिती देणे यंदाच्या वर्षी शाळांना शक्य होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी राबविण्यात येणारी ‘आरटीई’ अंतर्गतच्या २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रियाही वाढत्या लॉकडाऊनमुळे सतत लांबणीवर पडू लागली आहे. यामुळे पालकांना आपल्या मुलांना सोयीच्या शाळेत प्रवेश मिळण्याबाबतची चिंता लागली आहे.