मुंबई – “भाजपसोबत जाऊ या ,नाहीतर मला अटक होईल. असे म्हणत एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते”, असा खळबळजनक दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळासह मीडियामध्ये देखील जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आता स्पष्टीकरण दिल आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरेंना पाठिंबा देत, ते कधी खोटे बोलत नाहीत, असे त्या म्हणाल्या आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या,’मी आदित्य ठाकरे यांना जे काही ओळखते, त्यावरून आदित्य ठाकरे साधा, सरळ आणि सुसंस्कृत मुलगा आहे. त्यांनी घरातील काही अनुभव सांगितला असेल तर तो खराच असेल. तो सुसंस्कृत, चांगला मुलगा आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंच्या विधानाला एक प्रकारे पाठिंबा दिला.
काय म्हणाले होते नेमकं आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे ते म्हणाले होते.” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.