निलेश झेंडे
दिवे – अंजीर, सीताफळ, वाटाणा उत्पादनात पुरंदर तालुक्याची राज्यात मक्तेदारी आहे. मात्र, पारंपरिक, नगदी पिकांना आता आले उत्पादनाची जोड दिली जात आहे. नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांनी या पिकांची माहिती, अभ्यास करून लागवडीसाठी एकरी लाख रुपये खर्च केला आहे. यात महिला शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा ध्यास घेतला आहे.
अंजीर, सीताफळ व वाटाण्याला ग्राहकांकडून विशेष मागणी असते; परंतु करोनाने कांदा पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. उन्हाळी हंगामातही अंजीरची अवस्था तोळामासा झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे सीताफळ बागांचे भवितव्य लटकले आहे. या परिस्थितीत प्रयोगशील शेतकरी सतत नवनवीन प्रयोग करत असतो. करोनाने नगदी पिकांना बाजारपेठ मिळते का नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे दिवे परिसरातील काही शेतकऱ्यांनी आले लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. आले पिकांमध्ये सातारची मक्तेदारी आहे. पुरंदरमधील शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन पिकाची माहिती घेतली आहे.
तिथून बियाणे खरेदी करून त्याची भट्टी लावली. त्याला अंकुर फुटल्यावर लागवड सुरू केली आहे. त्यासाठी पन्नास हजारांचे बियाणे, खते, असा एकरी एक लाख रुपये खर्च केला आहे. या पिकाला आठ महिने ते एक वर्ष परिपक्व होण्यासाठी लागतात. पुढे दोन वर्षे जमिनीतच ठेवले तरी चालू शकते. दीर्घ कालावधीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. विकास टिळेकर यांनी सर्व शेतकऱ्यांना आले लागवडीसाठी प्रोत्साहित केले आहे. ज्ञानेश्वर झेंडे, संतोष झेंडे, निलेश झेंडे, विकास टिळेकर, नितीन टिळेकर, पांडुरंग गायकवाड, मुरलीधर झेंडे आदी शेतकऱ्यांनी आले लागवड केली आहे. यावेळी रेखा झेंडे, रूपाली झेंडे, रोहिणी झेंडे, दीपाली झेंडे, सुवर्णा आढाळगे, संगीता आढाळगे या नावीन्यपूर्ण शेतीसाठी पुढाकार घेत आहेत.