पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत पत्राशेड, हातगाड्या आणि टपऱ्यांवर सुरू केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे सत्तेच्या जोरावर “हप्तेखोरी’ करणाऱ्यांना चांगलाच चाप लागला आहे. महापालिकेच्या जागेसह मिळेल तिथे टपऱ्या उभारणाऱ्यांमध्ये यामुळे चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. छोट्या व्यवसायिकांच्या नावाखाली टाहो फोडणाऱ्यांचेही पितळ यामुळे उघडे पडले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे आणि पत्राशेडवर कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील प्रमुख रस्त्यासह आरक्षित जागांवर शेकडोंच्या संख्येने टपऱ्या उभारल्या गेल्या आहेत. शहरात रोजी-रोटीसाठी आलेल्या गोर-गरिबांना या टपऱ्या भाड्याने देऊन त्यांच्याकडून अव्याहतपणे हप्तेखोरी सुरू होती. गत पाच वर्षांत या टपऱ्यांचा उच्छाद शहरात मांडला गेला होता. जागा मिळेल तिथे टपरी आणि रस्त्यावरही पार्किंचा व्यवसाय थाटून याद्वारे लाखोंचा मलिदा गोळा करणारे निर्माण झाले होते.
मात्र, महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपताच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बेकायदा बोकाळलेला हा व्यवसाय मोडीत काढण्याचा निर्णय घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहराच्या संपूर्ण भागात एकाच वेळी ही कारवाई करत राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत असले तरी “हप्तेखोरी’ गोळा करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणल्याने त्यांनी या कारवाईला विरोध करताना गोर-गरिबांचा व्यवसाय चिरडला जात असल्याचा आव आणत त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतल्याचे पहावयास मिळाले.
टपऱ्या कोणाच्या ? चौकशीची आवश्यकता
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत उभारण्यात आलेल्या आणि भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या टपऱ्या कोणाच्या आहेत, याची चौकशी केल्यास बरेच काही बाहेर पडण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टपऱ्या उभारणाऱ्यांनी शहराचीच नव्हे तर प्रभागाची आणि रस्त्यांची वाटणी करून टपऱ्यांचा संसार थाटला आहे. हातगाडे, टपरी आणि पार्किंगच्या नावाखाली सुरू असलेली ही हप्तेखोरी एकदाची समुळ बंद करून हप्तेखोरांचा नायनाट होणे गरजेचे आहे.