चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आहे की प्रयोगशाळा. त्यांचे संघ व्यवस्थापन म्हणजे बंच ऑफ जोकर्स आहे, असे मोहिंदर अमरनाथही म्हणाले असते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी रवींद्र जडेजाला कर्णधारपद दिले गेले. नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जडेजाचे नाव पुढे केले. मग सलग पराभव स्वीकारल्यावर पुन्हा धोनीने नेतृत्व हाती घेतले. आता जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेरच गेला नाही तर स्पर्धेबाहेरही गेला. आता त्याला चेन्नईने सोशल मीडिया हॅंडलवरही अनफॉलो केले.
हे नक्की काय सुरू आहे. जडेजा संघाचा महत्त्वाचा भाग आहे, तो पुढील मोसमात चेन्नईकडून खेळू शकतो, असे त्यांचे सीईओ विश्वनाथ म्हणतात. जर सर्वकाही अलबेल असेल तर त्याला अनफॉलो का केले. त्याची दुखापत बरी होणार का, केव्हा तो संघात परतेल वगैरे काही सांगण्याच्या भानगडीतही ते पडले नाहीत. खरे सांगायचे तर धोनी व संघ व्यवस्थापनाने जडेजाचा पोपट किंवा बकरा म्हणा काहीतरी केले.
कर्णधारपद जडेजाकडे असतानाही धोनीच निर्णय घ्यायचा, त्याच्यावरच कॅमेराही असायचा. सततचे पराभव स्वीकारल्यावर धोनीने जडेजाकडून नेतृत्व आपल्या हाती घेतले. काही फरक पडला का, केवळ दोन सामने जिंकले. मात्र, स्पर्धेतून संघ बाहेर गेलाच की. मग जडेजाला हटवण्याचे कारण काय. मुळात त्याला कर्णधारपद देण्याचेच कारण काय होते. धोनीकडे नेतृत्व असते तरी काय फरक पडला असता. किमान जडेजाचा आत्मविश्वास तरी डगमगला नसता.
मुळातच जडेजा नेतृत्वासाठी नाही तर अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो. त्याने गोलंदाजी करत बळी घ्यावेत, अफलातून क्षेत्ररक्षण करून धावा रोखाव्यात, झेल घ्यावेत व संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा जिद्दीने फलंदाजी करत धावा कराव्यात हीच त्याच्याकडून अपेक्षा आहे. मग त्याने नेतृत्वही करावे ही कल्पना कोणाच्या नापिक डोक्यातून आली. (इथे सुपीक मुद्दाम म्हटले नाही. कारण सुपीक डोक्यातून अशा कल्पना येत नसतात). काही पराभवानंतर धोनीला साक्षात्कार झाला की जडेजा चुका करतोय व त्याने नेतृत्व हाती घेतले. पण तुमच्या सोईसाठी जडेजाचा बळी का दिला.
त्याला नेतृत्वात आलेल्या अपयशामुळे त्याची वैयक्तिक कामगिरीही सुमार झाली. त्याची गोलंदाजी दिशाहीन वाटली, त्याचे बदल अपयशी ठरले. अशाने एका गुणी खेळाडूचे खच्चीकरण झाले नसेल का? केवळ खच्चीकरण करण्यासाठीच त्याचा वापर झाला का? आपल्याला जडेजा या फुटकळ आयपीएल स्पर्धेसाठी नकोच आहे, त्याची गरज ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक स्पर्धेत तसेच त्याच्यापूर्वी व त्याच्यानंतर होत असलेल्या स्पर्धांमधील यशासाठी आहे, हे धोनीने लक्षात का घेतले नाही. सुरेश रैनाचे जे झाले तेच जडेजाचे करायचे होते का? याचीही उत्तरे धोनी व विश्रनाथ यांनी द्यावीत.