मुंबई – मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरले असा नाव न घेता शिवसेनेला जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून मतदारांशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तसेच मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरच निशाणा ठेवल्यामुळे राज यांनी भाजपला काही संकेत दिले आहेत याचीही चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे म्हणाले, जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला, तशा अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. तुम्ही जे विसरता ते त्यांच्या फायद्याचे ठरते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. ते म्हणाले अडीच अडीच वर्षे ठरली होती. मग महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा ते कधी बोलले का नाहीत. इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत. मोदी-शहा हे दोघे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तेव्हा हे का बोलले नाहीत?जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकते हे लक्षात आले. तेव्हा अडीच वर्षाचा विषय काढला. त्यानंतर एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणाबरोबर केले हेच समजेना, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगावर हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितले?
आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेलाही त्यांनी यावेळी लक्ष्य केले. आमदारांना घरे द्या आणि त्यांची फार्महाऊस आपल्या नावावर करून घ्या, अशी टिप्पणी करतानाच आमच्या आमदाराने सर्वात आधी त्यांना विरोध केला. आमदारांना मिळणाऱ्या पेंशनलाही त्यांनी विरोध केला. ते लोकांसाठी काम करत आहेत, उपकार करत नाही, तसेच मुख्यमंत्र्यांकडे घर कोणत्या आमदाराने मागितले होते असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचे राजकारण वाढले.
आपल्या भाषणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला लक्ष्य करताना ते म्हणाले की, जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार. जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचे राजकारण वाढले. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार. आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणते हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.
…पण सरकार सत्तेत आहे
जो माणूस इतिहास विसरला ना, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. आमचे गृहमंत्री आणि मंत्री जेलमध्ये जातात, पण सरकार सत्तेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात होतंय. छगन भुजबळ तुरुंगात होते, तेव्हाची आठवण करत म्हणाले की तुरुंगात राहिलेल्या व्यक्तीला सर्वात आधी मंत्री केले. गृहमंत्री तुरुंगात गेला, पण फरक पडत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंधांवरून नवाब मलिकांना अटक होते. हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर होतंय. आरोप एका मंत्र्यावर होतो आणि तो जेलमध्ये जातो, अशी टीका नवाब मलिक प्रकरणावरून राज ठाकरेंनी केली.
मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील
दरम्यान, आपला कोणत्या प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या विधानातून ते आता हिंदुत्वाचा अजेंडा घेणार का, अशा चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.