पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित केली आहे. आरक्षणाच्या निर्णयावर आयटीआय प्रवेश अवंलबून असून, प्रवेशाचे काय होणार या संभ्रमात पालक व विद्यार्थी अडकले आहेत.
प्रवेशप्रक्रिया ठप्प असल्याने विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाची चिंता भेडसावत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्पष्टता देण्याची मागणी पालकांतून होत आहे.
राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या दुप्पट अर्ज आले आहेत. राज्यभरात यंदा 3 लाख 24 हजार 863 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 88 हजार 60 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते.
मात्र, त्यातील 27 हजार 322 विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशनिश्चिती केली आहे. त्यात शासकीय आयटीआयमध्ये 29 टक्के, तर खासगी आयटीआयमध्ये 38 टक्के प्रवेश झाले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशाचे एकूण प्रमाण 31 टक्के इतके आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.