पुणे – कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात कारला झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यात अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
कार दरीत कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही औरंगाबादच्या तरुणांनी जखमींना बाहेर काढले आहे. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे.
सखुबाई उगले असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर उषा कोकणे, उर्मिला लागे, पांडुरंग मिलखे, सोनाली काटे, ऋषीकेश कोकणे आणि चालक आकाश गेगजे अशी जखमींची नावे आहेत. संबंधित सर्व जखमींना उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कारमधील सर्वजण कल्याणहून माळशेज घाटमार्गे वाडा (ता. खेड, जि. पुणे) येथे जात असताना हा अपघात घडला आहे. माळशेज घाटातून जात असताना लाजवंती पॉईंटजवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काही कळायच्या आत कार दरीत कोसळली. वाहन दरीत कोसळल्यानंतर अचानक पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हा अपघात आज पहाटे साडे तीनच्या सुमारास घटला आहे.
हा अपघात घडताच मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या औरंगाबाद येथील ट्रेकर्संनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदत कार्य सुरू केले. यामुळे कारमधील अन्य सहा जणांचे जीव वाचविण्यात यश आले.