हिमांशू
“”चौदा दिवस आम्हाला आपलं मानलंत… आणि पंधराव्या दिवशी का हो इतक्या क्रूरपणे दूर लोटलंत? एवढं क्रौर्य आम्ही युद्धात तरी दाखवलं का? असो… आम्हीही चौदा दिवस सलग, दिवसरात्र लढून दमलोय. तुमच्या निवडणूक निकालांचं विश्लेषण वगैरे होऊदे आता.. तोपर्यंत आम्ही विश्रांती घेतो…” असा फोन भारतातल्या वृत्तवाहिन्यांना करून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या सैन्याला “विश्राम’चा आदेश दिला की काय? रणगाडे, विमानं, तोफा, बॉंब, क्षेपणास्त्रं, रॉकेट्स वगैरे सगळं अचानक गायब झालं. “महायुद्ध, महायुद्ध’ म्हणून ओरडणारे अचानक तिकडे ढुंकून पाहिनासे झाले. जगाला अणुयुद्धाचा धोका आहे की नाही, या विषयावरची चर्चाही अपेक्षेप्रमाणं थांबली. “अपेक्षेप्रमाणं’ यासाठी की दहा मार्चला हेच होणार हे 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं तेव्हाच माहीत होतं.
यूक्रेनच्या वोलोदिमीर झेलेन्स्कींनासुद्धा शौर्य, निर्धार वगैरे दाखवायला 10 मार्चपर्यंतच संधी मिळणार, हे माहीत असावं. रशियानं भाजून काढलेली, ओसाड झालेली यूक्रेनमधली शहरं अचानक नजरेआड गेली तेव्हा कळून चुकलं, की एखादा विषय जगाच्या दृष्टीनं कितीही महत्त्वाचा असला तरी तो सोयीनुसार गायब होऊ शकतो. कच्च्या तेलाची भाववाढ आणि युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थीही विस्मृतीत गेले. अर्थात, आपल्याकडे एखादा विषय क्षणार्धात गायब होतो, तसाच एखादा विषय प्रदीर्घकाळ विस्मृतीत राहिल्यानंतर अचानक डोकं वर काढू शकतो.
उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम. निवडणूक संपली, की हा विषय कुंभकर्णासारखा दीर्घनिद्रेसाठी निघून जातो. पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या निकालादिवशी तो पृष्ठभागावर येतो. या विषयाचं आयुष्य पूर्वी चार-पाच दिवस तरी असायचं… आता बिचारा चार-पाच तासही सक्रिय राहू शकत नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पुरता “निकाल’ लागला आणि दिल्लीत अचानक बॅनर फडकू लागले… “”ईवीएम से हो रही है लोकतंत्र की हत्या!” निकालादिवशी सकाळी अकरा वाजता असे वेगवेगळे स्लोगन लिहिलेले बॅनर मोठ्या संख्येनं छापून तयार होते,
याचं फारच कौतुक वाटलं. या बॅनरवर सहकार्यकर्त्यांनी आपलेही फोटो टाकलेले दिसले. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. निकालाचा नेमका अंदाज यायला सुमारे दोन-तीन तास तरी लागतात. एवढ्या लवकर डिझाइन, प्रिंटिंग वगैरे सगळं “मॅनेज’ करायचं म्हणजे महायुद्धच! हा विचार करताना मुळातला ईव्हीएमचा विषयच मेंदूतून बाहेर पडला. या बॅनरबाजीची आणि घोषणाबाजीची फारशी दखल कुणी घेतली नाही हे खरं; पण निदर्शनांचं टायमिंग बघता वेगळ्या अर्थानं का होईना, ती लक्षात राहिली आणि मूळ प्रश्न मेंदूत पुन्हा डोकावला.
खरोखर ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम आहे का? नेमका हरणाऱ्यालाच यंत्रांबद्दल संशय कसा येतो? यंत्रं हीच आणि निकाल बरोबर उलटा… असं झालं असतं तर..? ईव्हीएम म्हणजे खरोखर “लोकतंत्र की हत्या’ वगैरे असेल तर “”जोपर्यंत ईव्हीएम रद्द होत नाहीत, तोपर्यंत आम्ही निवडणूक लढवणारच नाही,” असा निर्धार किती पक्ष दाखवतील? एकूण काय, तर विषय आला-गेला! राहता राहिले पुतीन… तर, पुन्हा चर्चेत येण्यासाठी ते काय करतात, हे आता बघायचं!