– हिमांशू
ज्याकाळी बॅंका नव्हत्या तेव्हा श्रीमंत लोक पैसाअडका आणि सोनंनाणं हंड्यात भरून तो जमिनीखाली पुरून ठेवायचे, असं सांगितलं जातं. बऱ्याचदा नवीन बांधकामासाठी जमीन खणताना असं गुप्तधन सापडल्याचे दावेही केले जातात. या गुप्तधनाच्या लालसेपोटी माणसं गंडेदोरे, काळी जादू एवढंच काय पण नरबळीपर्यंत वाट्टेल ते करताना दिसतात. गुप्तधन शोधून देण्याचा दावा करून जादूटोणा करणाऱ्या टोळ्याही सक्रिय आहेत. जमिनीखाली पुरलेलं धन शोधून काढणारं यंत्र आपल्याकडे आहे, असा दावा करून गंडवणारे महाभागही आहेत.
लालसा माणसाला सगळं करायला भाग पाडते आणि आता हीच लालसा बॅंकेतला पैसा काढून तो पुरून ठेवायलाही भाग पाडेल, अशी चिन्हं दिसतायत. ऑनलाइन खरेदी आणि पेमेंट ऍपच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्हे करून बॅंक खातं रिकामं करणाऱ्या ऑनलाइन भुरट्यांचे कारनामेही वाढलेत. एकट्या पुणे शहरातच जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 20 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. जानेवारी ते ऑगस्ट या काळात अशा 1114 गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली.
हे फक्त नोंदवले गेलेले गुन्हे आहेत आणि खरी संख्या याहून अधिक असू शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. फसवणुकीचा आकडासुद्धा “ऑनलाइन टास्क’ या एकाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये हडपलेल्या रकमेचा आहे. यामध्ये यूट्यूबला एखादा व्हिडिओ लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवायला सांगितलं जातं. त्यानंतर थोडीशी रक्कम खात्यात जमा होते. एकदा आपला विश्वास संपादन केला, की ही मंडळी “पेड टास्क’ सुरू करतात. टेलिग्रामवर एक ग्रुप स्थापन केला जातो.
त्यातले लोक “आज आम्हाला इतके पैसे मिळाले,’ असे स्क्रीनशॉट टाकत राहतात. परंतु ते सगळे लुटारू टोळीचे सदस्यच असतात. आपली लालसा वाढली, की आपण लाख-दोन लाखांची “गुंतवणूक’ करायला तयार होतो. एकदा पैसे गुंतवले की तिकडून मेसेज येतो, “तुमचा टास्क फेल झालाय आणि पैसे बुडणार आहेत. जर पैसे परत हवे असतील तर दुसरा टास्क करा.’ अशा प्रकारे हे शेपूट वाढतच जातं. आपल्या लक्षात येईपर्यंत हे सुरूच राहतं. अशा प्रकारे काहींनी दोन-दोन कोटी रुपये गमावलेत.
आपण अडकत चाललोय, हे आपल्या लक्षात का येत नाही? या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर म्हणजे लालसा…हव्यास! सामान्य माणसांचं सोडा, खुद्द पोलीससुद्धा या जाळ्यात अडकू शकतात, याचं नवल वाटतं. उत्तर प्रदेशात एका पोलिसाला “तुमच्या मुलानं सफारी कार जिंकली आहे,’ असा फोन आला. संबंधितांच्या मागणीनुसार बॅंक खात्याचा तपशील आणि आधार कार्ड पाठवलं, त्यानंतर लगेचच पोलिसाचा अकाउंट साफ झाला.
फसवणुकीच्या पद्धती रोज बदलत आहेत. लोकांना आमिष दाखवून ओटीपी पाठवायचा आणि तो विचारून बॅंक खातं ताब्यात घ्यायचं, हा प्रकारही आता जुना झाला. आता ओटीपीही लागत नाही. आपलं सिमकार्ड स्कॅन करून फसवणूक केली जाऊ शकते. हरघडी सावध राहावं, असं अत्यंत असुरक्षित वातावरण इंटरनेटच्या युगानं निर्माण केलंय; पण आपण बेसावधच राहतो, कारण एकच- हव्यास! बॅंकांऐवजी पैसे पुरून ठेवण्याची पद्धत पुन्हा अस्तित्वात येऊ नये, असं वाटत असेल, तर हव्यास टाळायला हवा.