शाळेची घंटा ऐकून कितीतरी वर्षं लोटली. भिंतींवर रेखाटलेली चित्रं पाहूनसुद्धा बरेच दिवस झाले. ज्या हायस्कूलातून शिक्षण घेतलं,
स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ घेतलं, ती किती लवकर विस्मृतीत जाते! तसं पाहायला गेलं तर एकदा गाव सोडलं, की बरंच काही विस्मृतीत जातं. पायांना ओढ लागलेली असते प्रगतीची… आणि मग पावलं शहराकडे वळतात. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी! पण तिथल्या गर्दीत जिथं स्वतःचंच अस्तित्व विरघळून जातं, तिथं मनाच्या तळकप्प्यात जपलेलं गाव कसं आठवणीत राहणार? नोकरी नवी असताना रजा काढून वर्षातून दोन-तीन वेळा गावची फेरी घडत असते; पण एकदा लग्न करून शहरात बिऱ्हाड थाटलं की मग फक्त यात्रेलाच येणं होतं गावाकडे.
शहरातून आलेला म्हणून गाववाले खूप मान देतात. कधी-कधी अडचणी सांगून मदत मागतात. कधी सल्ले घेतात. “नाव काढलंस, पोरा’ म्हणून शाबासकीही देतात. यात्रा संपली की कधी वाटतं, राहावं चार दिवस आणखी. पण शहरातली गर्दी बोलावू लागते आणि मग कळतं, की शहरात जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं खरं; पण ते गावी आल्यावरच जाणवतं. पुन्हा शहरात गेलं की गर्दीचा भाग बनणंच नशिबी येतं. पण इलाज नसतो. शेतजमीन मर्यादित असते. निसर्ग लहरी असतो. परिस्थिती अनुकूल करण्यासाठी पुन्हा गर्दीत जाऊन मिसळावंच लागतं.
गर्दीची सवय जडलेला हा देह आज मात्र सक्तीनं एकटा पडलेला… तोसुद्धा गावच्या शाळेत. पोरांचा कलकलाट नसलेली शाळेची इमारत भेसूर होऊन अंगावर येते. शहरात गेल्यापासून इतक्या वेळा गावी आलो; पण शाळेकडे पाहायलाही सवड झाली नाही, हा विचार मनाला कुरतडू लागतो. लहानपणीचे शिक्षक आठवतात. त्यांच्या हातून कधी आणि कोणत्या कारणासाठी मार खाल्ला, हेही आठवू लागतं. परीक्षेच्या काळात आलेलं टेन्शन आठवतं. वरच्या इयत्तेत गेल्यावर नव्या वर्गात बसावं लागतं. त्याच्याशी जुळवून घेण्यात काही दिवस निघून जातात आणि थेट पहिली चाचणी परीक्षाच येते. या वर्षारंभीच्या दिवसांमध्ये घेतलेला नव्याकोऱ्या पुस्तकांचा वासही आज इतक्या वर्षांनी आठवतो. कारण बरीच वर्षं दुर्लक्ष केलेली शाळेची इमारतच आज चोवीस तास डोळ्यासमोर असते.
भिंतींवरच्या चित्रांप्रमाणंच आढ्यावर लिहिलेले सुविचारही अंगावर येतात. “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे,’ हे साने गुरुजींचं वचन तर नेमकं कायम दिसेल अशा ठिकाणी! आज आहे का ही परिस्थिती? आपल्याच गाववाल्यांनी आज कसं पाहिलं आपल्याकडे? सगळे ओळखीतले, नात्यागोत्यातले, भावकीतले… अचानक परक्यासारखे वाटू लागले. जगाच्या शाळेत बरंच काही शिकलो; पण आज शाळा हेच जग झालं.
शाळेच्या रिकाम्या इमारतीची पंधरा दिवसांची ही सोबत आज गावागावांत अनेकांच्या नशिबी आलीय. “घरात राहिले तर गावभर फिरतील,’ या धास्तीमुळे “शाळाच बरी’ असं ठरलंय. ही शाळाच आज गावातून शहरात गेलेल्या अनेकांना नवं जीवनशिक्षण देतेय. ही बिनशिक्षकी शाळा आता नवा संस्कार देऊनच विद्यार्थ्यांना घरी सोडणार. कुणी अंतर “राखलं’ आणि कुणी अंतर “पाडलं’ याचे धडे देणार. चेहरे वाचायला शिकवणार… आणि अंतिम सत्यही सांगणार- खरा तो एकची धर्म!
– हिमांशू