– हिमांशू
लॉकडाऊन उठल्याबरोबर कामं सुरू होतील; पण कामावर जाण्याची इच्छा फार कमी जणांना असेल. घरात राहून-राहून पिचलेल्या, खचलेल्यांना निसर्गात जाऊन मनाच्या विंडोज् रिफ्रेश कराव्याशा वाटतील. कोणत्याही बाबतीत तोचतोपणा आला की कुठल्याही मार्गानं वातावरण रिफ्रेश करावंच लागतं. राजकारणात तर रिफ्रेश हा शब्दच सध्या गाजतोय.
कुठे उच्चारून तर कुठे न उच्चारता. राहुल गांधींनी ट्विटरवर अचानक अनेक ओळखीपाळखीच्या लोकांना अनफॉलो केलं आणि सगळ्यांचे धाबे दणाणले. एखाद्याशी आपला थोडाफार वाद किंवा कुरबूर झाली आणि व्हॉट्सऍपवर त्याचा डीपी अचानक दिसेनासा झाला, की त्यानं आपल्याला ब्लॉक केलं की काय? या शंकेनं आपल्याला टेन्शन येतं. इथे तर प्रत्यक्ष राहुल गांधींनी एकेकाला अनफॉलो करण्याचा सपाटा लावलेला. मग संबंधितांना कापरं भरणं स्वाभाविकच!
अनफॉलो केलेल्यांमध्ये कॉंग्रेसचे काही नेते आणि पत्रकारसुद्धा! हे पत्रकार राहुल गांधींच्या “जवळचे’ असल्याचं सांगितलं गेलं. म्हणजे काय? कुणास ठाऊक! कुणी-कुणी टेन्शन येऊ नये म्हणून “सुंठेवाचून खोकला गेला’ असेही उद्गार काढले म्हणे! काहीजणांना तर हा लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला नवा स्टंट वाटला. पण शेवटी राहुल गांधींचा अकाउंट मॅनेज करणाऱ्यांचा निरोप आला, की अकाउंट रिफ्रेश करायचं चाललंय. हे काम एकदा झालं, की राहुल गांधी अनफॉलो केलेल्या सगळ्यांना पुन्हा एकदा फॉलो करतील.
आम्ही ट्विटर वापरत नसल्यामुळे त्याचं अकाउंट रिफ्रेश वगैरे करावं लागतं का? आणि त्यासाठी विशिष्ट लोकांनाच अनफॉलो करावं लागतं का? या गोष्टी आम्हाला माहीत असणं शक्य नाही. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रत्येक ट्विटच्या “बातम्या’ होतात, तेव्हा साचलेपणा येतोच. अहो, राजकारणातच साचलेपण आलं असेल, तर राजकीय वक्तव्यांमध्ये ते येणारच! महाराष्ट्रात तर राजकारणातला शिळेपणा आता दूर होणार, अशा आशयाची सूचक विधानंही झाली.
त्यासाठी काही घडामोडींकडे लक्ष वेधलं गेलं. तत्पूर्वी काही दिवस एकमेकांना पत्रं लिहिण्याचे होते. कुणी, कुणाला, कशाबद्दल पत्र लिहिलं, एवढ्याच बातम्या येत राहिल्या. मग पत्राचा कंटाळा आल्यावर भेटीगाठी सुरू झाल्या. कुणी कुणाची भेट कुठे घेतली आणि त्यामुळे राजकारण ढवळून वगैरे निघण्याची शक्यता आहे का, याची चाचपणी मीडियानं सुरू केली.
अशा वेळी “रामराम… कसं काय?’ वगैरे सरळसाध्या उद्गारांचेही अन्वयार्थ लावायला सुरुवात होते. समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू होतात. तरीसुद्धा काही समीकरणं कधी जुळणार हे फक्त “परमेश्वरालाच ठाऊक’ असतं. एखाद्याच्या घरी एखाद्याचं जाणं-येणं बंद झालेलं असेल, तर संबंधितानं घराकडे पाठ फिरवली की घरानंच दरवाजे बंद केले, अशा इंटरेस्टिंग विषयावर उद्बोधक चर्चा रंगू लागते.
एकंदरीत तोचतोपणा, साचलेपणा दूर करण्याचा फंडा सध्या सुरू आहे. कंटाळा आला म्हणून राजकारणी “रिफ्रेश’ होतायत. अर्थात, त्यांच्यातल्या एकसुरीपणामुळे आपण बोअर होतो म्हटल्यावर ते स्वतःसुद्धा बोअर होत असणारच! खंत एकाच गोष्टीची वाटते. आयुष्याला दिशा देणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी जोमानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा होणार की नाही, हे लवकर समजत नाही तेव्हा ते किती बोअर होत असतील? आणि त्यांनी स्वतःला कसं रिफ्रेश करायचं? हे कुणीच सांगत नाही.