हिमांशू
“मध्यवर्ती कारागृह’ अशी अर्धवर्तुळाकृती पाटी दिसली नाही, असे चित्रपट बॉलिवूडमध्ये शोधावे लागतील. या पाटीवरून कॅमेरा खाली येतो आणि जेलच्या प्रचंड दरवाजाची दिंडी उघडली जाते. त्यातून व्हिलन (किंवा कधीकधी हिरोही) वाकून बाहेर पडतो आणि इकडेतिकडे बघतो. (हो, बघतोच!) शिक्षा भोगून बाहेर आलेल्या व्यक्तीला हार घालण्याची “आदर्श’ परंपराही आपल्याला चित्रपटातच दिसते. हारतुरे स्वीकारल्यावर संबंधित माणूस तिथेच निर्धार व्यक्त करतो… “ज्याच्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं, त्याला जिवंत सोडणार नाही…’ थोडक्यात तो माणूस पुन्हा तुरुंगात जाण्याची तयारी तुरुंगातून बाहेर पडल्या-पडल्याच सुरू करतो.
हे झालं चित्रपटांचं; पण आपल्याकडे तुरुंगाला पौराणिक महत्त्वही आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेत त्याचा उल्लेखसुद्धा केला आणि म्हणाले, “माझ्या कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना त्रास देण्याऐवजी मीच येतो तुमच्यासमोर… मला टाका तुरुंगात; पण श्रीकृष्णाचा जन्म जिथे झाला त्या जागेचा शोध तुम्हाला लागला असेल, तर मला त्या तुरुंगात टाका.’ बाकी तुरुंगाचा आणि राजकारणाचा संबंधही पौराणिकच! आपला शत्रू देवकीच्या पोटी जन्मास येणार, हे समजल्यामुळेच कंसानं तिला पतीसह तुरुंगात डांबलं होतं. आजच्या भाषेत सांगायचं तर तो “सत्तेचा दुरुपयोग’ होता. आज दररोज एका बाजूकडून हा आरोप केला जातोय आणि दुसऱ्या बाजूकडून भविष्यात तुरुंगात जाणाऱ्यांची नावं जाहीर केली जातायत.
आधी काही अधिकारी तुरुंगात गेले. नंतर नेत्यांचा नंबर लागला. अजून काही अधिकारी आणि काही नेते “प्रतीक्षा यादीत’ असल्याचं रोज बोललं जातंय. या घटनांचा राजकीय कार्यकारणभाव लावून आता कंटाळा आला. “आत’ या मंडळींच्या मनात काय उलथापालथ चालली असेल? हा प्रश्न कुणाला पडतो की नाही कुणास ठाऊक! या सगळ्यांना “जग हे बंदीशाला…’ हे गदिमांचं गाणं आठवत असेल का? “बाहेर’ गेल्यावर सर्वप्रथम काय करायचं, याची उजळणी रोज केली जात असेल का? आपल्या या स्थितीला सर्वाधिक जबाबदार कोण,
या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात असेल का? “दिलासा’ हा शब्द आपल्यासाठी नाहीच का, असा प्रश्न पडून ही मंडळी निराश होत असतील का? “तुम्हारा वक्त है… हमारा दौर आएगा’ असं आत जाता-जाता म्हटलेलं असलं तरी तो “दौर’ कधी यायचा, या प्रश्नानं व्याकुळता वाढत असेल का? असा विचार करत असतानाच परदेशातल्या दोन घटना समोर आल्या. पहिली दक्षिण कोरियातली. तिथल्या माजी राष्ट्रपती पार्क गुन यांना माफी मिळालीय. घोटाळ्याच्या आरोपाखाली त्या “आत’ होत्या. माफी मिळाल्यानंतर त्या तीन महिने रुग्णालयात होत्या आणि गुरुवारीच त्या घरी परतल्या आहेत.
दुसरी घटना लंडनमधली. गोपनीय दस्तावेज लीक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी बेलमार्श तुरुंगातच स्टेला मॉरिस या त्यांच्या वकील महिलेशी लग्न केलं. वकील मॅडमनी लग्नसोहळ्याचा खर्च स्वतः केला आणि भेटवस्तू वगैरे न देता असांजे यांची केस लढवण्यासाठी पैसे देण्याचं आवाहन केलं. परदेशांतली ही “प्रगती’ ऐकून काही वेळासाठी इथल्या तुरुंगवासीयांचं विस्मरण झालं… पण लगेच वाटलं, अशा कहाण्या ऐकून “त्यांना’ कसं वाटत असेल?