– हिमांशु
बाराशे रुपये दंड? अहो, अवघ्या बारा रुपयांत पुडी येते तंबाखूची! गुटख्याची किंमतसुद्धा त्याच्याच आसपास आहे. बंदी असली तरी मिळतो गुटखा. फक्त जरा महाग झालाय. खरं तर कोणत्याही व्यसनावर बंदी घालणं म्हणजे ते महाग करणं; परंतु आजअखेर आपल्या चाणाक्ष धोरणकर्त्यांना हे साधं-सोपं गणित समजलं कसं नाही, याचं आश्चर्य वाटतं. खोकण्यामुळं आणि शिंकण्यामुळं करोना पसरतो हे मान्य; पण थुंकण्यामुळंही तो पसरतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ऑफिशियली सांगितलंय का? असेल तर ते आमच्यापर्यंत कसं नाही पोहोचलं? डायरेक्ट दंडवसुली कशी काय सुरू करतात बुवा हे लोक?
आता तर दंडाची रक्कम दोनशेवरून बाराशे करण्याचा निर्णय होतोय म्हणे! किमान मुंबई पालिकेच्या हद्दीत तरी तंबाखूवाल्यांच्या तोंडाची आग होणार हे निश्चित..! खरं तर स्वतःला “शेतकरी कुटुंबातले’ म्हणवून घेणारे अनेकजण मंत्रिमंडळात नेहमीच असतात. मुंबई पालिकेतसुद्धा असतील; पण तंबाखू हा जगण्यासाठी किती महत्त्वाचा घटक आहे आणि थुंकणं ही किती सहजप्रक्रिया आहे, हे त्यांना ठाऊक नाही का?
करोना आल्यापासून आम्ही खोकताना दचकतो, शिंकताना लाजतो; पण थुंकताना मात्र आमच्या चेहऱ्यावर असा कोणताही भाव दिसत नाही. याला नैसर्गिकपणा म्हणतात. आम्हा मंडळींच्या सगळ्या सवयी तुम्ही मोडून काढू शकाल; पण थुंकण्याची सवय मोडणं आजवर भल्याभल्यांना जमलेलं नाही.
लोकांनी दारू सोडली; मटका-जुगारसुद्धा सोडला…; पण तंबाखू सोडणं फारसं कुणाला जमत नाही. गुटखा, पानमसाला हे नंतर आलेले पाहुणे; पण तंबाखू हा मात्र पूर्वापार, परंपरेनं चालत आलेला शौक आहे. तंबाखूवाल्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर सरकार पाडण्याइतकी ताकद जमवू शकतात; परंतु दुर्दैवानं आपल्याकडे जातिधर्मावर किंवा अन्य गोष्टींवर आधारित संघटनाच अधिक तयार झाल्या. तंबाखू शौकिनांनी संघटना बनवून मागण्या समोर ठेवल्या आणि आंदोलनाचा इशारा दिला तर सरकारला पळता भुई थोडी होईल! करोनाच्या काळात म्हणे थुंकणाऱ्यांवर कारवाईच होत नाही. पोलिस आणि राज्य शासन बघ्याची भूमिका घेतात.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कडक क ारवाईची तरतूद आहे. पण अंमलबजावणी होत नाही, हे दाखवून देणारी जनहित याचिका दाखल झाली आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास बाराशे रुपयांच्या दंडाची तरतूद आहे, हे पहिल्यांदाच समजलं. आतापर्यंत दोनशे रुपयांत प्रकरण मिटत होतं. आता मारली पिचकारी की काढा बाराशे रुपये..! अर्थात, आमच्यातले चतुर लोक पाचशेत सौदा पटवतील आणि दंड वसूल करणारा दंड भरणाऱ्याच्या पुडीतली तंबाखू खाऊन पुढे जाईल.
त्यामुळं पिचकाऱ्या मारणाऱ्यांकडून दंड वसूल करायचाच असेल, तर वसुली करणारा तंबाखूशौकीन नाही, याची काळजी घ्या! थुंकण्यामुळं लोकांना एवढा त्रास का होतो, कोण जाणे! खरं तर बटाटा चिप्स खाऊन, मिनरल वॉटर पिऊन प्लास्टिक कचरा वाढवण्यापेक्षा हे कधीही चांगलं; पण प्लॅस्टिकवाल्यांना अजिबात दंड नाही, असं का? थुंकी झेलणाऱ्यांची आणि या बोटावरची त्या बोटावर करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे एवढी अफाट असताना तंबाखूशौकिनांनी तोंड दाबून (तोंडात तोबरा दाबून) बुक्क्यांचा मार दंडाच्या रूपानं सहन का करावा, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. यंत्रणेने सहानुभूतीनं विचार करावा..!