– हिमांशू
नमस्कार! आज नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे (असं मानणार्यांना) नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ज्यांच्या आयुष्यात 31 डिसेंबरनंतर थेट 2 जानेवारी उजाडतो, त्यांनाही उद्यापासूनचं संपूर्ण वर्ष आनंदाचं, भरभराटीचं जावो असं चिंतितो. वस्तुतः रात्रीचे 11ः59 आणि 12ः01 यात तसा ङ्गारसा ङ्गरक नाही. पण कॅलेंडरचं केवळ पान न पलटता कॅलेंडरच बदलत असल्यामुळे तिथून पुढे सर्वकाही नवंनवं… आनंदाचं! अर्थात, 2024 हे वर्ष (किमान एप्रिल-मेपर्यंत) सर्व राशींच्या व्यक्तींना आनंदाचंच जाणार याची खातरजमा करण्यासाठी वार्षिक राशीभविष्य वाचण्याची गरजच नाही. सर्व राशींच्या मनोरंजनस्थानी लोकसभेची निवडणूक विराजमान झालेली असल्यामुळे आणि बहुतांश लोकांच्या करमणुकीच्या संकल्पनाही अंतर्बाह्य बदललेल्या असल्यामुळे निम्मं वर्ष तरी इतकं हसतखेळत जाणारे, की कोणतेही विघ्न आलं तरी जाणवणार नाही.
नव्या वर्षाच्या पहिल्या दहा दिवसांत महाराष्ट्रदेशी काहीतरी ‘सॉलिड’ राजकीय घडणार असं सांगितलं जात असल्यामुळे हे दहा दिवसच काहीजणांना एक वर्षासारखे वाटतील हे खरं; पण आवाजी ङ्गटाक्याची वात पेटवावी, कान-डोळे बंद करून थरथरत उभं राहावं आणि वात जळून गेल्यावर ‘ङ्गुस्स्’ आवाज यावा असंही काहीतरी घडू शकतं म्हणे! त्यामुळे नेमकं काय घडणार, याविषयी आपापलं राजकीय आणि तांत्रिक ज्ञान ठिकठिकाणी पाजळत बसण्याऐवजी ते काम व्यासंगी अँकर्स आणि यूट्यूबर्सवर सोपवून मोकळं व्हावं, असा नववर्षाचा पहिला मौलिक सल्ला काही जाणकार देतात.
ज्यात सक्तीनं का होईना मन गुंतवावं, असा एक विषय नववर्षारंभी आपल्यासमोर आहे. आजपासून आपण एखाद्या दुकानात जाऊ, सामानसुमान खरेदी करू आणि काउंटरवरचा क्यूआर कोड स्कॅन करू; परंतु खरेदी केलेल्या वस्तू बाजूला ठेवून ‘चार तासांनी या,’ असं दुकानदार म्हणू शकतो. कारण, यूपीआय कोड स्कॅन केल्यानंतर संबंधिताच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी चार तास लागणार आहेत. दुकानदार आणि ग्राहक एकमेकांना ओळखत असतील तर प्रश्न नाही. पण अनोळखी ग्राहकाला यूपीआय पेमेंटच्या आधारे वस्तू देणं दुकानदाराच्या जिवावर येणारंय. कारण केलेलं पेमेंट चार तासांपर्यंत आपण कॅन्सल करू शकतो. हा निर्णय भारताच्या रिझर्व्ह बँकेनं चोरमंडळींना अद्दल घडवण्यासाठी घेतला असला, तरी चोरांपेक्षा सर्वसामान्यांनाच तो अधिक जाचक ठरण्याची चिन्हं आहेत.
चोरांचं काय, कोणत्याही नव्या कुलपाची चावी काही दिवसांनी ते शोधून काढतातच. त्यांच्या मेंदूच्या विकासाचा वेग तंत्रज्ञानाच्या विकासाच्या वेगापेक्षा अधिक असतो. मधल्या मध्ये दुकानदार-ग्राहक संबंध मात्र ताणले जाणार. एकतर ग्राहकांमध्ये ऑनलाइन खरेदीची क्रेझ वाढल्यामुळे स्थानिक दुकानदार खरोखर त्रस्त आहेत. आता ऑनलाइन व्यापारी कंपन्या ग्राहकांना अधिक जवळच्या वाटणार! असो, नेमका ‘प्रयोग’ काय आहे आणि तो कसा अंमलात येणार, याबद्दल आताच काही बोलणं उचित नसल्यामुळे वाट पाहणं चांगलं.
यूपीआय खात्यावर संपूर्ण वर्षात एक व्यवहार केला तरी खातं सुरू राहणारंय. तेवढा व्यवहार ओळखीपाळखीवर नक्की होईल. बाकी निवडणूक वर्ष असल्यामुळे स्वस्ताईचं स्वप्न काही प्रमाणात का होईना जमिनीवर उतरण्याची वाट पाहता येईल. पेट्रोल-डीझेल वगळता एखादी वस्तू किंवा सेवा चुकूनमाकून जीएसटीच्या जाळ्याबाहेर राहिली असेल, तर त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होवो, याच नववर्षाच्या शुभेच्छा!